India Pakistan War : भारत आणि पाकिस्तामध्ये पेटलेला संघर्ष दर दिवसागणिक आणखी धुमसताना दिसत असतानाच आता या दोन्ही देशांमध्ये पडणारी ठिणगी वणव्याचं रुप धारण करणार याच भीतीनं अनेकांना धडकी भरली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागातील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कडाडून निषेध करत भारतानं ऑपरेशन सिंधूची हाक देत पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उध्वस्त केले.
भारताच्या या कारवाईवर आता पाकिस्ताननंही प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला सुरू केला. मात्र पाकिस्तानचे सर्व हल्ले आले त्याच वेगानं भारती. सैन्यदलानं प्रचंड ताकदीनं परतवून लावले. पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारतानं उध्वस्त केले, तर या देशाची एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा नष्ट करण्यात आली. इतकं होऊनही पाकिस्तानच्या कुरापती थांबत नसून आता 26/11 प्रमाणं सागरी मार्गानं घुसखोरी करण्याचा डाव साधण्याचा प्रयत्न पाकिस्तान करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांमार्फत मिळत आहे.
पाककडून घुसखोरीसाठी सागरी मार्गाची निवड केली जाण्याचा धोका असतानाच नुकतीच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्त्वाची बैठक पार पडली. नौदल ठिकाणं, संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या सूचना जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं समुद्रकिनाऱ्यांनजीक न जाण्याचा इशारासुद्धा जारी करण्यात आला असून, लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार आहे. शिवाय सध्या पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती. 26/11 प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी केला आहे.
फक्त मुंबईच नव्हे, कोकण आणि देशातील इतरही महत्त्वाच्या किनाऱ्यांच्या बाबतीत सध्या सतर्कता बाळगली जात आहे. सुट्ट्यांचे दिवस आणि पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईसह कोकणात समुद्र किनारी भागात संरक्षण दलाच्या हालचाली वाढल्या असून इथं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय कोणत्याही संशयित बोटी किंवा हालचाली दिसल्यास पोलिसांना याची तातडीनं माहिती द्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.