पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; दगडूशेठ गणपती मंदिरातही...

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूने वार पलटवार सुरु आहेत.  पाक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.

वनिता कांबळे | Updated: May 9, 2025, 09:15 AM IST
 पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; दगडूशेठ गणपती मंदिरातही...

India Pakistan War :  भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तनाने पलटवार करण्याचा प्रयत्न केला मात्र, भारतीय सैन्याने सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. पुण्याहून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच  दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

भारताने पाकिस्तानचे 50 ड्रोन हल्ले उधळून लावले. पाकिस्तानने उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नरगोटा येथे मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने ते सर्व ड्रोन हल्ले उधळून लावले. भारताकडून पाकिस्तानवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रं डागली. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घराजवळ ड्रोन हल्ला केला. कराची बंदरही उद्ध्वस्त करण्यात आले. 

पुण्याहून 13 विमानांचे उड्डाणे रद्द करण्यात आले आहे.  पाकच्या हल्ल्यानंतर  पुण्याहून इतर शहरात जाणारी प्रवासी विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. अमृतसर, हैदराबाद, कोची, जोधपूर, चंदिगड, राजकोट, जयपूर, सुरतला जाणाऱ्या फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. 

पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुण्यातील दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले आहे. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घेण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर आहेत.  फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने हे आवाहन केले आहे.  सर्व डॉक्टर व वैद्यकीय संस्थांना स्थानिक यंत्रणांसोबत समन्वय ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. औषधे, खाटा व अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा. अधिकाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा साठा करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  नागरिकांना देखील मदत करण्याचे  आवाहन फेडरेशनने केले आहे. 
सध्याच्या परिस्थितीमुळे, 9 आणि 10 मे 2025 रोजी होणाऱ्या पंजाबी विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील.