मोबाईल चोरीला गेला तेव्हा तक्रारही नव्हती घेतली; आता पोलिसांकडून सत्कार; बिरदेवने दाखवली शिक्षणाची ताकद!

IPS Birdev Done: मोबाईल चोरीला गेला म्हणून बिरदेव पोलीस स्थानकात गेला होता. पण त्याची तक्रारही नोंदवून घेण्यात आली नव्हती. 

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 30, 2025, 04:51 PM IST
मोबाईल चोरीला गेला तेव्हा तक्रारही नव्हती घेतली; आता पोलिसांकडून सत्कार; बिरदेवने दाखवली शिक्षणाची ताकद!
बिरदेव डोणे

IPS Birdev Done: कोल्हापूर जिल्ह्यातील यमगेच्या कागल येथील बिरदेव सिद्धप्पा डोणेने यूपीएससी परीक्षेत 551वा रँक पटकावला. देशात दरवर्षी लाखो तरुण-तरुणी यूपीएससी देतात. त्यातील काहींच्याच वाट्याला यश येते. बिरदेव डोणे यापैकीच एक. पण बिरदेवचं या यशानंतर विशेष कौतुक होतंय. कारण त्याला मिळालेलं हे यश सहजासहजी नव्हतं. अनेक वर्षे संघर्षावर मात कठोर परिश्रम आणि सातत्य राखत त्याने हे यश मिळवलं. त्याच्या या यशानंतर देशभरातून त्याचं कौतुक होतंय. नुकताच पोलिसांकडून बिरदेवचा सत्कार करण्यात आला. यानंतर बिरदेवच्या चाहत्यांकडून बिरदेवची पोलीस स्थानकासंबंधीची आठवण शेअर केली जातेय. कधीकाळी मोबाईल चोरीला गेला म्हणून बिरदेव पोलीस स्थानकात गेला होता. पण त्याची तक्रारही नोंदवून घेण्यात आली नव्हती. आज पोलीस बोलवून बिरदेवचा सत्कार करतायत. काय आहे हा किस्सा? सविस्तर जाणून घेऊया. 

बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका  मेंढपाळाचा मुलगा आहेत. तो लहानपणापासून हुशार होता पण त्याच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती. त्याचे आईवडिल मेंढ्या चारायचे. निकाल लागला त्यादिवशीदेखील बिरदेव मेंढरं चारायला गेला होता. कारण त्याच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती.  बिरदेव डोणे याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यामध्ये पोलीस अधिकारी त्याचा सत्कार करत आहेत. मुरगूड पोलीस ठाणे यांच्याकडून सत्कार समारंभ झाल्याचे बिरदेव आपल्या पोस्टमध्ये म्हणतोय. या पोस्टवरुन त्याच्या चाहत्यांना बिरदेवच्या मोबाईल चोरीची घटना आणि त्याला आलेल्या कटू अनुभवाची आठवण झालीय.

बिरदेवची मोबाईल चोरीची कटू आठवण

बिरदेव डोणे यांच्याबद्ल अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त होतायत. बिरदेव यांनी केलेला संघर्ष, त्यांना आयुष्यात आलेले कटु अनुभव ते सांगतायत. अशीच एक आठवण आहे मोबाईल चोरीची. काही दिवसांपूर्वी बिरदेव यांचा मोबाईल पुण्यात हरवला. यानंतर पोलीस तक्रार द्यावी म्हणून बिरदेव पोलिस स्थानकात गेला. पण पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. 

यानंतर बिरदेवने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. पुढे ज्या पोलिसाने तक्रार घ्यायला टाळाटाळ केली होती त्याच पोलिसांनी तक्रार घेतली. असे असले तरी बिरदेवला अजूनही त्याचा फोन काही सापडला नाही. 

फोन सापडला का? असं विचारायला बिरदेव अधूनमधून पोलीस स्टेशनला जायचा. तेव्हा 'तपास चालू आहे, सापडला की कळवू' हे ठराविक साच्यातील उत्तर बिरदेवला मिळत होते. 

बिरदेवची मोबाईल चोरीची तक्रार न घेणारा तो पोलीस कोण होता? ते पोलीस स्थानक कोणते होते? या गोष्टी पुढे आल्या नाहीत. पण बिरदेव आता खूप पुढे गेलाय.  त्यामुळे त्याच्यादृष्टीने अशा अनेक गोष्टी एक कटु आठवणीप्रमाणे असतील, असे त्याचे मित्र सांगतात. आता चांगल्या भावनेने अनेकजण पुढे येऊन बिरदेवचं कौतुक करतायत. या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनीही बिरदेवचा सत्कार करुन त्याचं कौतुक केलंय. यावेळी बिरदेवने नेहमीप्रमाणे हसऱ्या चेहऱ्याने आपला सत्कार स्वीकारला. 

बिरदेववर व्यक्त होतंय प्रेम 

यूपीएससीची परीक्षा दिल्यावर बिरदेवचा फोन चोरीला गेला होता. त्याची तक्रार देण्यासाठी बिरदेव पोलीस स्थानकात गेला होता. पण त्याला कोणी तिथं उभं केलं नाही. त्याची तक्रार कोणी दाखल करुन घेतली नाही. पण आज तो बिरदेव आयपीएस झालाय, अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिलीय. बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही, असा विश्वासही बिरदेवबद्दल व्यक्त केला जातोय.  इतक्या कठीण परिस्थितीत हा विद्यार्थी यूपीएससी उत्तीर्ण होऊ शकतो तर आपणही होऊ, अशी प्रेरणा आपल्या यशाकडे बघून इतरांना होईल, असे बिरदेवला वाटते.