आधी पालघर साधू हत्याकांडात गंभीर आरोप, आता त्याच्याच हाती भाजपने दिलं कमळ!

Kashinath Chaudhary joins BJP: पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून भाजपने आरोप लावलेले काशिनाथ चौधरी आता पक्षात सामील झाले आहेत.

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 17, 2025, 06:38 AM IST
आधी पालघर साधू हत्याकांडात गंभीर आरोप, आता त्याच्याच हाती भाजपने दिलं कमळ!
काशिनाथ चौधरी

Kashinath Chaudhary joins BJP: तुम्हाला पालघर साधू हत्याकांड नक्कीच लक्षात असेल. ज्यावरुन भाजपने महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते.  पालघर जिल्ह्यात लॉकडाउन काळात दोन निहत्थे साधू (चिनमयानंद आणि सुधाम महाराज) व त्यांच्या चालकाची जमावाकडून निर्घृण हत्या झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. भाजपने तत्कालीन ठाकरे सरकारवर कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा, हत्याकांडाला प्रोत्साहन देण्याचा गंभीर आरोप ठेवला. पोलिसांच्या उपस्थितीत घडलेल्या हत्येला राजकीय संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. भाजपने मुंबई-पालघर जनआक्रोश यात्रा काढली व सीबीआय तपासाची मागणी केली. राष्ट्रवादी नेते काशिनाथ चौधरींवर मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला. याच काशिनाथ चौधरी यांचा भाजप प्रवेश झाल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून भाजपने आरोप लावलेले काशिनाथ चौधरी आता पक्षात सामील झाले आहेत. रविवारी डहाणू येथे खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या समोर त्यांनी कमळ चिन्ह स्वीकारले. त्यांच्यासोबत तीन हजाराहून अधिक समर्थकांनीही भाजपची वाट धरली. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन झाले.

भाजपकडून गंभीर आरोप

2020 मधील साधू हत्याकांडात भाजप नेत्यांनी चौधरींना प्रमुख दोषी ठरवले होते. राज्यभरात ठाकरे सरकारवर टीका करताना हे प्रकरण हाती घेतले. एकनाथ शिंदे यांनी तर शिवसेना बंडाचे एक कारण म्हणून साधूंच्या हत्येचा उल्लेख केला होता. 'आम्ही हे सहन करू शकत नव्हतो,' असे ते म्हणाले होते.

साधू हत्याकांडाची घटना

16 एप्रिल 2020 च्या रात्री सुरतला जाणारे दोन साधू आणि त्यांचा ड्रायवर गडचिंचले गावात जमावाच्या हल्ल्यात मारले गेले. हा प्रकार अतिशय क्रूर होता. पोलिसांनी 200 लोकांना ताब्यात घेतले आणि 108 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. हे सर्व महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडले.

विरोधकांचा सवाल

ज्यांच्यावर भाजपने इतके गंभीर आरोप केले, त्याच चौधरींचा पक्षात स्वागत कसा? मागील आरोप कुठे गेले? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विचारत आहेत.हा प्रवेश नगरपालिका निवडणुकीच्या आधीचा असल्याने राजकीय चर्चा रंगली आहे.

राजकीय बदल

चौधरी आधी राष्ट्रवादीत होते. आता भाजपमध्ये येऊन त्यांनी कमळ हाती घेतले. यामुळे जिल्ह्यातील राजकारणात नवे वळण आले आहे. विरोधक हे प्रकरण हाती घेऊन भाजपच्या दुटप्पीपणावर बोट ठेवत आहेत, तर भाजपला यातून स्थानिक ताकद वाढवण्याची संधी दिसतेय.

FAQ 

१. पालघर साधू हत्याकांड नेमके काय घडले होते?

१६ एप्रिल २०२० च्या रात्री सुरतला जाणारे दोन साधू आणि त्यांचा चालक गडचिंचले गावात जमावाच्या हल्ल्यात क्रूरपणे मारले गेले. पोलिसांनी २०० जणांना अटक केली आणि १०८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. हे प्रकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडले.

२. भाजपने काशिनाथ चौधरींवर काय आरोप केले होते?

भाजप नेत्यांनी चौधरींना साधू हत्याकांडातील मुख्य संशयित ठरवले होते. ठाकरे सरकारवर टीका करत राज्यात मोठा गदारोळ केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बंडाचे एक कारण म्हणून या हत्येचा उल्लेख केला आणि 'आम्ही हे पाहू शकत नव्हतो' असे म्हटले.

३. काशिनाथ चौधरी आता भाजपमध्ये कसे सामील झाले?

रविवारी डहाणू येथे खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत चौधरींनी कमळ चिन्ह स्वीकारले. त्यांच्यासोबत ३ हजाराहून अधिक कार्यकर्तेही भाजपमध्ये आले. यामुळे विरोधक मागील आरोपांचे काय झाले असा प्रश्न विचारत आहेत.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More