'धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद द्या', महंत नामदेवशास्त्रींची सरकारकडे मागणी, क्लीन चिट मिळण्याआधीच फिल्डिंग?

भगवान बाबा जेव्हा मारतात तेव्हा काठीचा आवाज येत नाही. मात्र आयुष्य उध्वस्त होतं असा इशाराही नामदेव शास्त्री यांनी दिला आहे  

शिवराज यादव | Updated: Apr 17, 2025, 08:53 PM IST
'धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद द्या', महंत नामदेवशास्त्रींची सरकारकडे मागणी, क्लीन चिट मिळण्याआधीच फिल्डिंग?

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. याआधीही नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झालीय. त्यानंतर धनंजय मुंडेंवरही अनेक आरोप करण्यात आले होते.
 
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंवरही अनेक आरोप करण्यात आले. याच प्रकरणात मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच पुन्हा एकदा भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केलं आहे. मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत असं नामदेवशास्त्रींनी म्हटलं आहे. 

तर आमच्यात खडा टाकून नका, भगवान बाबा जेव्हा मारतात तेव्हा काठीचा आवाज येत नाही. मात्र आयुष्य उध्वस्त होतं असा इशाराही नामदेव शास्त्री यांनी दिला आहे.  दरम्यान नामदेव शास्त्रींचा रोख कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकणात धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आले. वाल्मिकच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदार सुरू होती. तेव्हा भगवानगडावर जात मुंडे यांनी नामदेवशास्त्रींची भेट घेतली होती. त्यानंतर शास्त्री यांनी गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे असं म्हणत पाठिंबा दर्शवला होता. तेव्हा नामदेव शास्त्रीवर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती.

धनंजय मुंडेंची पाठराखण करताना संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपीची मानसिकता समजावून घेतली पाहिजे असंही नामदेवशास्त्रींनी म्हटलं होतं. मात्र जेव्हा सरपंच देशमुख यांच्या क्रुरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आले तेव्हा नामदेवशास्त्रींना उपरती आली.. फास्टट्रॅकवर खटला चालवून आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी यावेळी नामदेवशास्त्री यांनी केली होती.

यानंतर पुलाखालून खूप पाणी गेलं आहे. याच प्रकरणातील आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. यावरून आता काय प्रतिक्रीया उमटताहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.