Kolhapur Ganja Seized: कोल्हापूर जिल्ह्यात शेतात गांजा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यामध्ये दुसरी कारवाई करत शेतात पिकवलेला 15 किलो गांजा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातच गांजाची शेती होत असल्याचं उघड झालंय.
गेल्या काही दिवसात राज्यभरात गांजाची शेती करण्याचं प्रमाण वाढलंय. ऊसाच्या पिकात दिसणारं गांजाचं पीक दिसू लागलंय. गांजा पिकविणं कायद्यानं गुन्हा असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी ऊसामध्ये गांजाची लागवड केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वाशी ते शेळकेवाडी रस्त्याला लागून असणाऱ्या शेतामध्ये 42 वर्षीय शेतकरी जयदीप शेळके हा गांजा शेती करत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शेताच्या मध्यभागी पिकवलेला 15 किलो गांजा जप्त केलाय.
4 दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी कागल तालुक्यातील मद्याळ गावात शेतामध्ये लावलेला 21 किलो गांजा जप्त करून 75 वर्षीय शेतकरी दिनकर कृष्णा राणेला अटक केली होती. गांजाची शेती करणं कायद्याने गुन्हा असतानाही या शेतकऱ्यानी गांजाची शेती करून हा गांजा कुणाला पुरवला, याची पाळंमुळं कोल्हापूर पोलीस खोदून काढत आहेत.
कोल्हापुरात आत्तापर्यंत झालेल्या कारवायांमध्ये गांजाची परराज्यातून तस्करी होत असल्याचं समोर आलंय..पण आता जिल्ह्यातच दोन शेतकरी गांजाची शेती करत असल्याचं समोर आल्यानं जिल्ह्यात सापडणारा गांजा जिल्ह्यातच पिकवला जातोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोल्हापूर पोलीस दलानं अमली पदार्थांविरोधात जोरदार कारवाई सुरू केलीय. वर्षभरात जवळपास 99 लाख रुपयांच्या अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केलाय.
पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईचं नागरिकांनी स्वागत केलंय...पण आता शेतकरीच गांजा पीकवू लागल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. पोलिसांनी आतापर्यंत 80 हून जणांना ताब्यात घेतलंय. यातून गांजाचं रॅकेट कसं चालतंय? या पाठीमागे कोण आहे..याची उत्तरं कोल्हापूर पोलिसांनी शोधून काढून मुळापर्यंत पोहचायला हवं.