Maharashtra Din: 1 मे रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठी तब्बल 106 आंदोलक हुतात्मे झाले. 1 मे रोजी त्यांना आदरांजली वाहिली जाते. दरम्यान यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी झालेला लढा आठवला जातो आणि पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा दिला जातो. यादरम्यान ज्या नावांची आठवण काढली जाते त्यातील एक नाव म्हणजे सदाशिव कानोजी पाटील आहे. त्यांना स का पाटील या नावाने ओळखलं जातं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांची नेमकी काय भूमिका होती हे जाणून घ्या.
स का पाटील यांचा जन्म कोकणात झाला. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षण घेताना त्यांना असंख्या अडचणींचा सामना करावा लागला. गावी शालेय शिक्षण झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत पोहोचले होते. याचदरम्यान महात्मा गांधींपासून प्रेरित होऊन ते असहकार चळवळीत सहभागी झाले होते. त्यांनी काही शाळा सुरु करत शिक्षण कार्यही केलं. काँग्रेस नेते विठ्ठलभाई पटेल यांना ते गुरु मानत असत.
विशेष म्हणजे लहानपणी शिक्षणसाठी धडपडणाऱ्या स का पाटील यांनी लंडनमधून पत्रकारिता केली. यासाठी त्यांना महात्मा गांधींची मदत लाभली. आर्थिक ऐपत नसताना त्यांच्या समजातील मडंळींनी त्यांच्यासाठी आर्थिक मदत उभारली होती. स्वातंत्र्य चळवळीमुळे त्यांनी पत्रकारिकेतील करिअर सोडलं. पुढे ते बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस झाले.
1935 ते 1952 दरम्यान स का पाटील नगरसेवक होते. यादरम्यान त्यांच्याकडे पालिकेचं महापौरपदही आलं होतं. मरिन लाईन्सवर दिसणारा क्वीन नेक्लेस हा त्यांच्याच कार्यकाळात बांधण्यात आला.
स का पाटील यांची संयुक्त महाराष्ट्राबाबात नेमकी काय भूमिका होती, याबाबत मतांतरं असल्याचं आहेत. राजकीय इतिहास संशोधक य दि फडके आणि लालजी पेंडसे यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये स का पाटील यांची भूमिका विरोधी होती असा उल्लेख केला आहे. तसंच मुंबई महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही असं वक्तव्य त्यांनी केल्याचाही उल्लेख आहे. पण स का पाटील यांचे नातू सुहास ठाकूर यांनी बीसीसी मराठीशी बोलताना वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. 'अशी हिंसा केली तर मुंबई महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही' असं खरं विधान होतं असं ते म्हणाले आहेत.
स का पाटील यांनी त्यांच्या आत्मकथेतही उल्लेख केला आहे. मी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या विरोधात कधीच नव्हतो. देशाची भाषेच्या आधारावर विभागणी होऊ नये, इतक्याच मताचा मी होतो असं त्यांनी सांगितलं होतं. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र निर्मितीत माझ्या सहभागाचा कुठे उल्लेख केला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली होती.
स का पाटील यांना संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचं निमंत्रणही देण्यात आलं नव्हतं. त्यांनीच याबद्दल सांगितलं होतं. मी 10 मे 1960 रोजी अमेरिकेला जाणार होतो. पण स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण न मिळाल्याने 1 मे रोजीच गेलो असं त्यांनी सांगितलं होतं.