18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार अन् 40 लाख रोजगार; दावोसमध्ये काय घडलं?

Devendra Fadanvis On Davos:  यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 22, 2026, 10:34 PM IST
18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार अन् 40 लाख रोजगार; दावोसमध्ये काय घडलं?
दावोस दौरा

Devendra Fadanvis On Davos: दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

परदेशी गुंतवणुकीचा मोठा वाटा

एकूण करारांपैकी 83 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीचे आहेत. 18 देशांमधून अमेरिका, जपान, सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स, युएई इत्यादी देशातून ही गुंतवणूक येत आहे. उर्वरित 16 टक्के गुंतवणूक परदेशी तंत्रज्ञान भागीदारीतून आहे. एसबीजी, ब्रुकफिल्ड, आर्सेलर मित्तल, स्कोडा, फॉक्सवेगन, टाटा, अदानी, रिलायन्स, कोकाकोला अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

गुंतवणुकीचे क्षेत्र आणि वितरण

ही गुंतवणूक एआय, क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सेंटर्स, ग्रीन स्टील, फिनटेक, लॉजिस्टिक्स अशा आधुनिक क्षेत्रांत येणार आहे. राज्याच्या सर्व भागांत गुंतवणूक वाटली जाणार आहे – एमएमआर आणि कोकणमध्ये 22 टक्के, विदर्भमध्ये 13 टक्के, तर उर्वरित 50 टक्के इतर भागांत. कोकणात 3.5 लाख कोटी, विदर्भात 2.7 लाख कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 55 हजार कोटी, उत्तर महाराष्ट्रात 50 
हजार कोटी इत्यादी प्रमुख गुंतवणूक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या प्रकल्प आणि संकल्पना

टाटा समूहासोबत मुंबईजवळ देशातील पहिली इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे. यासाठी 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करून कचरा व्यवस्थापन, पाणी आणि हवेच्या समस्या सोडवल्या जातील. रायगड-पेण येथे ग्रोथ सेंटर उभारण्याची घोषणा झाली असून, त्यासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमीचा विकास!

मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी तयार करणार असून मुंबईतील पाणी, हवा याचे प्रश्न यातून सोडविण्यात येतील. सर्व प्रकारच्या वेस्टवर प्रक्रिया झाली पाहिजे, हा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. पुढे हीच संकल्पना सर्व मोठ्या शहरांमध्ये नेण्यात येईल. मुंबईत पुढच्या 2 ते 3 वर्षात हा परिणाम आपण दाखवू शकू. रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा याच दावोसमध्ये करण्यात आली. या ग्रोथ सेंटरमुळे एक बिझनेस डिस्ट्रीक्ट तयार होईल. यात 1 लाख कोटींची गुंतवणूक कालच आली आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अन्य महत्त्वाच्या घडामोडी

झिम्बाब्वेचे परराष्ट्रमंत्री प्रो. अ‍ॅमोन मुरविरा यांनी महाराष्ट्राच्या सौरऊर्जा क्षेत्रातील प्रगतीची प्रशंसा केली. तसेच अ‍ॅलन टुरिंग इन्स्टिट्यूटचे मिशन संचालक अ‍ॅडम सोबे यांच्याशी वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत चर्चा झाली. गेल्या वर्षीचे 75 टक्के करार प्रत्यक्षात आले असून, यावेळचे करार 3 ते 7 वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More