अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागतेय टँकरवर; उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नागरिकांसाठी उपाययोजना कधी करणार?

Maharashtra Water shortage: यंदा राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच आता पाणीटंचाईचाही मोठा प्रश्न उभा ठाकलाय.

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 18, 2025, 09:24 PM IST
अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागतेय टँकरवर;  उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नागरिकांसाठी उपाययोजना कधी करणार?
पाणीटंचाई

Maharashtra Water shortage: सध्या नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तडाख्यात पाण्यासाठी नागरिकांची दररोजची पायपीट सुरू असून महिलांचे हाल होत आहेत. आजमितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवावी लागत आहे. 

यंदा राज्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच आता पाणीटंचाईचाही मोठा प्रश्न उभा ठाकलाय. राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळं गावागावात टॅंकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याचं चित्र आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत.गेल्या आठवड्यात हा आकडा 223 होता, मात्र आठवडाभरात हा आकडा अडीचशेपेक्षा जास्त झालाय. सध्याच्या परिस्थितीला अर्ध्या महाराष्ट्राची तहान टँकरवर भागवण्याची वेळ आलीय.

कोणत्या जिल्ह्यात किती टॅंकर?

- ठाणे- 36 टँकर
- रायगड -21 टँकर
- पालघर- 17 टँकर
- नाशिक- 22 टँकर
- अहिल्यानगर- 56 टँकर
- पुणे- 31 टँकर
- सातारा- 55 टँकर
- सांगली- 02 टँकर
- सोलापूर- 05 टँकर
- छत्रपती संभाजीनगर- 135 टँकर
- जालना- 46 टँकर
- नांदेड- 02 टँकर
- अमरावती- 12 टँकर
- वाशिम- 01
- बुलढाणा- 28 टँकर
- यवतमाळ- 08 टँकर

उन्हाचा पारा वाढत असल्यानं अनेक छोट्या-मोठ्या तलावांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत आहे. तर ग्रामीण भागांमधील विहिरी आणि बोरवेलचं पाणीदेखील आटलंय.त्यामुळं अनेक भागात पिण्यासाठी पाणीच नसल्यानं टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतोय.अजून एप्रिल महिना संपायचा बाकी आहे. मे महिन्यात हे पाणीसंकट आणखी रौद्ररुप धारण करू शकतं. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना होणं आवश्यक आहे.

'लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा',आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर?

लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी लगावला.. त्यानंतर कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी पुन्हा महायुती सरकारला घेरलंय. महायुतीचं सरकार सत्तेत येऊन 5 महिने उलटून गेलेत. मात्र महायुतीनं जाहीरनाम्यात दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन अजून पूर्णत्वास गेलेलं नाही. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवारांपासून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कर्जमाफीचा निर्णय लांबणार असल्याचीच वक्तव्य आजवर केलीयत. आता पुन्हा एकदा याच कर्जमाफीच्या मुद्दयावरुन विरोधकांनी महायुती सरकारला घेरलंय. लाडक्या बहिणींची तर काळजी घ्या मात्र लाडक्या दाजींना दिलेलं कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय. दुसरीकडे नाशकात झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही महायुतीला त्यांच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची आठवण करुन दिली. महायुतीनं जाहीरनाम्यात थापा मारल्याचा आरोपच ठाकरेंनी केला. मागच्या सरकारमध्ये महायुतीसोबत असलेले बच्चू कडूंचे महायुतीसोबतचे संबंध कडू झाले आणि ते महायुतीतून बाहेर पडले. मात्र आता त्याच बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 28 तारखेला आंदोलनाची हाक दिलीय आणि महायुतीला शिंगावर घेतलंय.