)
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातून पावसाची तीव्रता कमी झाली असली तरीही या पावसानं राज्याची पाठ मात्र अद्यापल सोडलेली नाही हेच सिद्ध होत आहे. अशा स्थितीत नवा महिना सुरू झाल्या कारणानं आतातरी हा पाऊस थांबणार की दिवाळीच्या मुहूर्तावरही बरसणार, असाच धडकी भरवणारा प्रश्न सारे विचारताना दिसत आहेत. दरम्यान, पुढील 24 तासांसाठीचा राज्याची पावसाचा अंदाज समोर आला असून हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरणार असल्याचा इशारा दिला आहे. अर्थात काही जिल्हे मात्र इथं अपवाद ठरतील.
मुंबई मुख्य शहर आणि उपनगरांमध्ये काही काळासाठी पाऊस विश्रांती घेईल. मात्र अधूनमधून येणाऱ्या जोरदार सरींमुळं नागरिकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या वाऱ्यांची प्रणाली गुजरातच्या दिशेनं पुढे जात असल्या कारणानं राज्यात पावसाचा जोर ओसरला खरा. मात्र अद्यापही हे सावट मात्र टळलेलं नाही.
विदर्भाच्या पूर्व क्षेत्रावरल पावसाळी ढगांचं अच्छादन असून या भागात पावसाच्या दृष्टीनं होत असलेली पोषक वातावरणनिर्मिती पाहता हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तर, राज्याच्या उत्तरेकडील जिल्यांना मात्र या पाऊसमाऱ्यातून किमान दिलासा मिळाला आहे. पुढील 24 तासांमध्ये ऊन- पावसाचा खेळ बहुतांशी जिल्ह्यांसह शहरांमध्येही पाहता येणार आहे. यातूनच इंद्रधनुष्यासारख्या निसर्गलीला नागरिकांना थक्क करतील.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या अर्थात पहिल्याच दिवशी राज्यातील यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. ज्यामुळं इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांना पावसानं दिलासा दिला असला तरीही काही भागांवर मात्र हे सावट कायम आहे. कोकण, पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाळी ढगांच्या दाटीसह धुक्यामुळं दृश्यमानता तुलनेनं कमी राहील असं हवामान विभागकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कच्छ आखात क्षेत्र आणि नजीकच्या भागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्राकार वाऱ्यांची निर्मितीसुद्धा होत आहे. अरबी समुद्राच्या दिशेनं जाणारे हे वारे आणखी तीव्र होत असून यामुळं मध्य प्रदेशावरही पावसाचा प्रभाव दिसून येईल. तर, अंदमानच्या उत्तरेला निर्माण झालेल्या चक्रिय वाऱ्यांमुळं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं हे वारे किनाऱ्यावर येत असताना त्याचा वेग आणि तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. ज्या धर्तीवर किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी झाली आहे का?
होय, पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी राज्यावर अद्यापही त्याचा प्रभाव कायम आहे. पुढील 24 तासांत काही भागांत जोर ओसरेल, पण काही जिल्ह्यांना अपवाद आहे.
ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबणार का?
नवा महिना सुरू झाल्याने पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, पण दिवाळीपर्यंत बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठीचा अंदाज दिला आहे.
मुंबईत पावसाची स्थिती काय असेल?
मुंबई मुख्य शहर आणि उपनगरांत काही काळासाठी पावसाला विश्रांती मिळेल, पण अधूनमधून जोरदार सरी येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडू शकतो.