Missing Girls in Maharastra: राज्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातून 18 ते 25 वयाच्या सरासरी 70 मुली रोज बेपत्ता होताय. ही आकडेवारी निश्चितच सर्वांची चिंता वाढवणारी आहे. यातून यंत्रणांबाबतही अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. (Maharastra Crime News 2200 girls were reported missing in March, an average of 70 girls disappeared per day)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना दुसरीकडे राज्यात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढलंय. एकट्या मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्यायेत. फेब्रुवारी महिन्यापेक्षा ही आकडेवारी 307ने जास्त आहे. विशेष म्हणजे बेपत्ता होणा-या मुलींमध्ये 18 ते 25 वयोगटातील मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे, या वयोगटातील दररोज 70 मुली बेपत्ता होतायेत. त्यामुळे पालकवर्गाची चिंता वाढलीय. 


बेपत्ता झालेल्या मुलींचं प्रमाण


यंदाच्या वर्षी जानेवारीत 1600 मुली बेपत्ता असल्याची नोंद झाली तर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 1 हजार 810 इतका होता. मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास 2200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. बेपत्ता तरूणींची जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक नोंद पुणे जिल्ह्यात आहे. तिथं 228 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये 161, कोल्हापुरात 114, ठाण्यात 133, अहमदनदरमध्ये 101, जळगावात 81, सांगलीत 82 तर यवतमाळमध्ये 74 मुली बेपत्ता झाल्या आहेत. 


आणखी वाचा - Weather Forecast : राज्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पुन्हा जोरदार पाऊस


अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवणं, लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेणं, मुलींना वाईट मार्गाला लावणं, नोकरीचं आमिष दाखवून शोषण करणं अशा घटनांमुळे महिलांच्या, तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलाय. अनेक तरूणांना वैश्याव्यवसायात ढकललं जातय. तर घर सोडून जाणा-या मुलींचं प्रमाणही अधिक आहे. विशेष म्हणजे 2022 च्या मार्च महिन्यातील आकडेवारी पाहिली तर पोलीस रेकॉर्डवरील 1695 मुलींचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. मग या मुलींचं काय झालं? एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होत असल्याच्या नोंदी असतानाही पोलीस प्रशासन त्यांचा शोध का घेऊ शकलेलं नाही हा देखील निश्चितच संशोधनाचा विषय आहे.