मतदान केंद्रावर आमदार संतोष बांगरांच्या करामती, निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर काय कारवाई?

MLA Santosh Bangar: हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनजवळ उभं राहून घोषणाबाजी करताना दिसले. 

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 2, 2025, 10:37 PM IST
मतदान केंद्रावर आमदार संतोष बांगरांच्या करामती, निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर काय कारवाई?
संतोष बांगर

MLA Santosh Bangar: हिंगोली शहरातील मतदान केंद्रावर आमदार संतोष बांगरांच्या करामती पाहायला मिळाल्यात. संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर केला, एवढंच नव्हे तर थेट ईव्हीएमजवळ जाऊन घोषणाबाजीही केली. ते कमी की काय? संतोष बांगरांनी चक्क एका आजीला ईव्हीएमवर ते सांगतील ते बटन दाबायला लावलं.आपल्या बेलगाम वागण्यानं शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी चक्क लोकशाहीलाच नांगर लावल्याची चर्चा आता राज्यभर सुरु झालीये.

Add Zee News as a Preferred Source

हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनजवळ उभं राहून घोषणाबाजी करताना दिसले. ज्या मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही, त्या मतदान केंद्रात संतोष बांगर चक्क मोबाईल घेऊन गेले. एवढ्यावरच हे महाशय थांबले नाहीत, त्यांनी ईव्हीएम मशीनसमोर मोबाईल कॅमेराही सुरु केला.

संतोष बांगर मतदान करताना त्यांच्या कार्यकर्त्यांचा गराडाही पडला होता. कार्यकर्त्यांनीही मोबाईल कॅमेरे सुरु ठेवले होते. एवढं कमी की काय संतोष बांगर यांनी ईव्हीएमजवळ घोषणाबाजीही केली. हा सगळा ड्रामा केल्यावर, नियमांचं वस्त्रहरण केल्यावरही संतोष बांगर यांचं मन भरलं नाही. त्यांनी त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या महिला मतदाराला बांगर यांनी मतदानाबाबत विचारायला सुरुवात केली.

हे सगळं सुरु असताना मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाच्या एकाही कर्मचा-यानं आमदार साहेबांच्या या कृतीवर आक्षेप घेतला नाही. त्यामुळं निवडणूक आयोगावरही टीका होतेय. शिवाय दोन ते तीन टर्म आमदार असलेल्या संतोष बांगर यांच्या वागण्यावरही टीका होऊ लागलीये.

निवडणूक आयोगानंही झालेल्या प्रकाराबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. पण झालेल्या प्रकाराबाबत सांगतानाही निवडणूक निर्णय अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली वाटले. संतोष बांगर यांच्या झुंडशाहीच्या, बेलगाम वर्तनामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही संतप्त झाले. संतोष बांगर यांनी आपण काय वागतो कसं वागतो याचा विचार करावा अशा शब्दात फडणवीसांनी त्यांना सुनावलं.

संतोष बांगर हे आमदार आहेत. गल्लीबोळातला गुंड नाही. विधिमंडळात कायदे करणारे लोकप्रतिनिधी गुंडमवाल्यासारखे वागू लागले तर सामान्यांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यावा?. संतोष बांगर यांच्यासारखे आमदार महाराष्ट्राचं राजकारण कलंकित करतायेत असं खेदानं म्हणावं लागेल.

FAQ

१. प्रश्न : हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात नेमकं काय केलं?

उत्तर : शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन प्रवेश केला, ईव्हीएम मशीनजवळ उभं राहून घोषणाबाजी केली, मोबाईलने व्हिडिओ काढला आणि एका वृद्ध महिला मतदाराला (आजीला) “ते सांगतील तेच बटन दाबायला” सांगितलं. यामुळे मतदानाच्या गुप्ततेचा भंग झाल्याचा गंभीर आरोप आहे.

२. प्रश्न : या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई झाली आहे?

उत्तर : निवडणूक आयोगाला तक्रार केल्यानंतर हिंगोली पोलिसांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर भारतीय दंड संहिता व लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी दबावात असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

३. प्रश्न : मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया आहे?

उत्तर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “आमदार असूनही असे बेलगाम वागणे योग्य नाही, आपण कसे वागतो याचा विचार करावा.” त्यामुळे पक्षातही बांगर यांच्यावर नाराजी आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More