राज-उद्धव युतीच्या प्रश्नावर चिडणाऱ्या शिंदेंना 5900 कोटींचा उल्लेख करत सवाल, 'कल्याण-डोंबिवलीकरांच्या...'

Eknath Shinde Angry Comment About Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे संतापले होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 22, 2025, 10:48 AM IST
राज-उद्धव युतीच्या प्रश्नावर चिडणाऱ्या शिंदेंना 5900 कोटींचा उल्लेख करत सवाल, 'कल्याण-डोंबिवलीकरांच्या...'
राज ठाकरेंच्या नेत्याने यादीच दिली (प्रातिनिधिक फोटो)

Eknath Shinde Angry Raj-Uddhav Alliance: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य युतीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'कामाचे बोला' असे उत्तर दिलं. याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघामधील कामांची यादी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मांडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासंदर्भात विचारणा केली आहे. ही कामे कधी होणार असा सवाल राजू पाटील उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्र्यांना डिवचले

मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीवर विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागावून कामाचे बोला असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रश्न उपस्थित करुन उपमुख्यमंत्री यांना डिवचले आहे. याबाबत बोलताना मनसे नेते राजू पाटील यांनी, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्रकाराने मनसे-उबाठा गटाच्या युतीबाबत विचारले असता शिंदे यांनी पत्रकाराला कामाचे बोला असे बोलले. त्यानंतर मला एकनाथ शिंदे यांना कामाची तळमळ असल्याची जाणीव झाली. माझी बरीचशी कामे या मतदारसंघात बाकी आहेत," असं म्हटलं आहे.

"ते कामाचं बोला असे बोलले म्हणून मी..."

पुढे बोलताना मनसे नेते राजू पाटील यांनी पलावा पूल, कल्याण शीळ रोड याबाबत त्यांना आठवण करून दिली आहे. "ते कामाचं बोला असे बोलले म्हणून मी कामाचं बोललो आहे आता बघू ते काम करतात की नाही," असा टोला राजू पाटील यांनी लगावला आहे. "जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत," अशा मथळ्याखाली राजू पाटील यांनी थेट एकनाथ शिंदेंना टॅग करुन पोस्ट केली आहे. "परवा आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नासंदर्भात संबंधित पत्रकाराला चिडून बोलले की कामाचे बोला! चला तर मी पण काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोच. किमान नगरविकास मंत्री व आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे," असं म्हणत राजू पाटील यांनी कामांची यादीच दिली आहे.

कामांची यादीच मांडली

राजू पाटलांनी मांडलेली यादी खालीलप्रमाणे : 

> पलावा पूल कधी होईल?

> लोकग्राम पूल कधी होईल?

> दिवा रेल्वे आरओबी (ब्रीज) कधी होईल?

> बिल्डरांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या कल्याण-तळोजा मेट्रोचे भूसंपादन कधी होईल? आणि जर ते झाले नसेल तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी सुरू केलेले मेट्रोचे हे काम,ज्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे ते काम कधी स्थगित करणार?

> कल्याण-शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळेल व तिसरी लाईन कधी होईल?

> पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामांच्या जागामालकांना मोबदला देऊन ती बांधकामं तोडून पलावा चौक मोकळा करून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू करणार?

> 27 गावांसाठी असलेली अमृत योजना कधी पूर्ण करणार?

> कल्याण-डोंबिवलीकरांच्या हक्काचा नवी मुंबईला दिलेला 140 एलएलडी पाणी कोटा आम्हाला कधी वर्ग करणार?

> अनधिकृत पणे सुरू केलेला दिवा डंपिंग कधी बंद करणार?

> नवी मुंबईत नव्याने घेतलेल्या 14 गावांच्या विकासासाठी आवश्यक 5900 कोटी रूपयांचा पॅकेज कधी देणार?

> कल्याण-डोंबिवलीतल्या 27 गावांचा प्रश्न कधी मार्गी लावणार?

> मानपाडा रोड व कल्याण-शीळ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कधी हटविणार?

एकनाथ शिंदेंना केलं टॅग

पोस्टचा शेवट करताना राजू पाटील यांनी, "उत्तर द्या एकनाथ शिंदेजी!" असं म्हणत एकनाथ शिंदेंचं अधिकृत एक्स हॅण्डल टॅग केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओही शेअर केला आहे.