ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार? चर्चा सुरु असताना राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली 'अशी' सूचना!

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत. 

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 21, 2025, 01:49 PM IST
ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार? चर्चा सुरु असताना राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली 'अशी' सूचना!
राज ठाकरे

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणे शक्य असल्याचे विधान महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत केले. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंनीदेखील आपल्या भाषणातून याला प्रतिसाद दिला. यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. कुटुंब एकत्र येत असेल तर त्याचे स्वागत असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून येतेय. दरम्यान राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सत्ताधाऱ्यांकडून या गोष्टीचे समर्थन करण्यात येतंय तर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून याला कडाडून विरोध होतोय. हिंदीच्या सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शाळेच्या शिक्षकांनी संचालक मंडळांच्या भेटी घेत त्यांना निवेदन देण्यात येत आहे. हिंदीच्या सक्ती विरोधात सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे आणि तसं सरकारला कळवलं ही पाहिजे. हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, असे मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय. 
 
पहिली पासून हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून साने गुरुजी विद्यालय दादर येथे शाळेचे मुख्याध्यापक संचालक यांना निवेदन देण्यात येणार आहे. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते साने गुरुजी विद्यालयात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उध्दव ठाकरे - राज ठाकरे युती बाबत आता चर्चा नको, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केल्याचे वृत्त समोर येत आहे. युतीबाबत माध्यमांशी न बोलण्याचे आदेश शिवतिर्थावरुन देण्यात आले आहेत. 29 एप्रिल रोजी राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर या विषयावर बोलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज ठाकरेंची टाळी अन् उद्धव ठाकरेंच्या अटी 

राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी काही अटी घातल्यात.. दरम्यान या अटींनंतर राज ठाकरे युती करणार नसल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला. युतीचा हा प्रस्ताव अटी-शर्थींवर अडकणार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी मात्र, युतीसाठी अटी-शर्थी टाकल्या आहेत.महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं छोटी, एकत्र येणं हे विशेष नाही. महाराष्ट्राच्या आड येणा-यांना घरी बोलवणार नाही हे ठरवा मग बोला... उद्धव ठाकरेंच्या याच अटी-शर्थींवरुन मनसे नेते आक्रमक झालेत. उद्धव ठाकरेंच्या अटींवरुन मनसे नेते संदीप देशपांडेंनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कोणत्याही अटी टाकल्या नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. भाजपसोबत बोलू नका, शिंदेंना घरी बोलावू नका, अशा अटी घातल्याचे समजते. उद्धव , राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चेनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज ठाकरेंना अटी-शर्थींवर नमवणं सोप्प नसल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. तसंय ते अटींवर युती करणार नसल्याचा दावा देखील सामंतांनी केला आहे.राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला. तर राऊतांच्या टीकेवर शेलारांनी देखील पलटवार केला. राज ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावानंतर बंधूभेट होणार असल्याची चर्चा रंगली आहे.  मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या अटी-शर्थींमुळे युती होण्याआधीच ती फिस्कटणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.