Local Accident: 'ट्रेनला उशीर झाला की...'; 'रेल्वेमंत्री रिल्समध्ये व्यस्त' म्हणत नेत्याने मांडली मुंबईकरांची व्यथा

Mumbai Local Train Accident: या अपघातामध्ये आठ जण लोकल ट्रेनमधून पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असून आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 9, 2025, 12:13 PM IST
Local Accident: 'ट्रेनला उशीर झाला की...'; 'रेल्वेमंत्री रिल्समध्ये व्यस्त' म्हणत नेत्याने मांडली मुंबईकरांची व्यथा
रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी (प्रातिनिधिक फोटो)

Mumbai Local Train Accident: मुंबईमधील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन लोकल ट्रेनमध्ये दारात उभं राहून प्रवास करत असेलल्या प्रवाशांचा ट्रॅकवर पडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये रेल्वेच्या प्रवक्त्यांनी अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील रेल्वेच्या दारात उभ्या राहिलेले प्रवाशी एकमेकांना घासले गेले आणि त्यामध्येच ते ट्रॅकवर पडल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया समोर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

लाखो प्रवाश्यांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो

 "रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल होत आहे," असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. "मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाखो प्रवाश्यांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो. अश्याच 6 प्रवाशांचा आज अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे," असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा

"सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन लटकत ट्रेनमधून पोटापाण्यासाठी प्रवास करतात. हा लोकल ट्रेनचा प्रवास आता मुंबईकरांच्या जीवावर उठला आहे. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. महायुती सरकारने आता तरी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा," असं वडेट्टीवार म्हणालेत. "मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाही, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाही, ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा मुंबई लोकलच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यस्त असतात," असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सुप्रिया सुळेंचं प्रवाशांना आवाहन

"ट्रेनमधून खाली पडल्यामुळे पाच प्रवाशांना प्राण गमावावे लागले. दिवा - मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करीत होते. अशा पद्धतीने प्रवास करणे धोकादायक आहे. नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण धोकादायक पद्धतीने प्रवास करु नये. यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी," असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेसचा धक्का लागल्याने काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला; ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.