Metro Station: पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना उडाली आहे. वरळी भुयारी मेट्रो स्टेशनला गळती लागलेली पाहायला मिळाली. वरळी मेट्रो स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. झी 24 तासने याची एक्स्क्लूझिव्ह दृश्य प्रेक्षकांना दाखवली. मात्र आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांना तिथल्या सुरक्षा रक्षकांनी अडवलं आणि तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मेट्रोची दुरावस्था दाखवण्यासाठी पत्रकारांना मज्जाव करण्यात आला.
मुंबईतील मेट्रो कामाची पोलखोल आज पहिल्याच पावसात पाहायला मिळाली. पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो ठप्प झाली. पावसातील एखादा धबधबा असावा अशी अवस्था मेट्रो स्टेशनची झाली. मेट्रो 3 मध्ये वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकांना अडवण्यात आलंय. कुलाबा, वांद्रे हा मेट्रो प्रकल्प महत्वकांशी आहे. अनेक अडचणींनतर हा मेट्रो प्रकल्प सुरु झाला. यामुळे नागरिक आनंदी होते. पण मुंबईच्या पोटात पाणी शिरण, मेट्रोमध्ये पाणी शिरणं करणे ही गंभीर बाब आहे.
Worli Underground Metro Water Logging | मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो कामाची पोलखोल #worli #undergroundmero #zee24taas #waterlogging #marathinews pic.twitter.com/5h2dzfrf4S
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 26, 2025
मेट्रो स्थानक पूर्णपणे चिखलमय झालंय. इथे काही प्रवासीदेखील अडकलेले दिसले. त्यांना आता सुखरुपपणे बाहेर काढण्यात येतंय. त्या प्रवाशांमध्ये सुरक्षारक्षक झी 24 तासच्या प्रतिनिधींना पोहोचू देत नव्हते. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात ही विदारक परिस्थिती पाहायला मिळत. मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल आणि डेब्रिज अशी अवस्था आचार्य अत्रे वरळी मेट्रो स्थानकाची झालेली पाहायला मिळाली.
मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डॉ. अॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले. ही घटना सांडपाणीनिःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याने घडलेली आहे. ही भिंत प्रवेश/निकास संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आली होती. पाणी शिरलेला प्रवेश/निर्गम मार्ग सध्या बांधकामाधीन असून प्रवाशांसाठी खुला झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र -आरे जेव्हिएलआर ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्टीकरण एमएमआरसीकडून देण्यात आलंय. आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी व सुरक्षा पथकाने घटनास्थळी तात्काळ कार्यवाही सुरू केली असून, बाधित भागाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे एमएमआरसीने म्हटलंय. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची असून, सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आलीय.