सहर शेखच्या 'कैसे हराया...'ला आव्हाडांचं खोचक उत्तर, 'चॉकलेट लाया.. असं...'; 'हिरवा मुंब्रा'वरुनही सुनावलं

Jitendra Awhad On Sahar Shaikh Kaise Haraya Speech: 16 तारखेला महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये सहर शेखने थेट जितेंद्र आव्हाड यांना भाषणाच्या सुरुवातीलाच डिवचलं होतं. यावरुन आता आव्हाड यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय जाणून घ्या

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 28, 2026, 08:15 AM IST
सहर शेखच्या 'कैसे हराया...'ला आव्हाडांचं खोचक उत्तर, 'चॉकलेट लाया.. असं...'; 'हिरवा मुंब्रा'वरुनही सुनावलं
आव्हाडांनी दिलं उत्तर

Jitendra Awhad On Sahar Shaikh Kaise Haraya Speech: खासदार असदुद्दीन ओवेसींचा अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएम पक्षाने ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 30 मधून मुंब्र्यातून संपूर्ण पॅनल निवडून आणलं. यामध्ये मुंब्र्यामधील एमआयएमची तरुण नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख हे त्याच्या निवडणुकीपूर्वीच्या आणि जिंकल्यानंतरच्या व्हायरल भाषणांची भारतभर चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळीचे मित्र असलेल्या युनुस शेख यांनी शेलक्या शब्दांमध्ये आव्हाडांवर निशाणा साधल्याचं या व्हायरल भाषणांमधून पाहायला मिळालं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सहर शेखने केलेल्या भाषणाचा व्हिडीओही व्हायरल झाला. या टीकेवर आता आव्हाड पहिल्यांदाच बोलले आहेत. महानगरपालिकेच्या निकालानंतर मंगळवारी पहिल्यांदाच आव्हाड एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची भेट घेण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानन्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी जाहीर भाषणामध्ये सहरच्या आणि तिच्या वडिलांच्या विधानांचा समाचार घेतल्याचं दिसून आलं. ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात...

Add Zee News as a Preferred Source

सहर काय म्हणाली होती?

'कैसा हरया...' असं म्हणत विजयानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणाची सुरुवातच सहरने जोरजोरात हसत आव्हाडांना डिवचत केलेली. तिने पुढे 'आता एवढ्यावरच  न थांबवता येणाऱ्या काळात आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल तेव्हा आपल्याला संपूर्ण मुंब्रा शहर हे हिरव्या रंगाने रंगून टाकायचं आहे,' असं वक्तव्य सुद्धा केलं होतं. 

आव्हाडांचा मित्र काय म्हणालेला?

युनुस शेख यांनी प्रचाराच्या भाषणामध्ये आव्हाडांना 'झुटा जितेंद्र' म्हणून संबोधले. 'मी तुझा 23 वर्षांपासूनचा मित्र आहे, पण आजपासून तुला कोणीही जितेंद्र आव्हाड म्हणणार नाही. तुझे नाव आता झुटा जितेंद्र आहे. मी सर्वांना माफ केले, पण या खोटारड्या जितेंद्र आव्हाडला कधीच माफ करणार नाही," असं युनुस शेख म्हणाले होते. तसेच, आव्हाडांच्या पक्षाच्या 'तुतारी' (ट्रम्पेट) प्रतीकावरुन टीका करताना, "तुतारीची मुतारी करुन टाका" अशी खालच्या भाषेतील टीका केली होती. "जर तू प्रभाग क्रमांक 30 मध्ये कधी फिरताना दिसला तर मी तुला कुत्र्यासारखा मारेन. माझं डोकं फिरलं तर तुझी मुंब्र्यातली एंट्री बंद करुन टाकेन. आता वॉर्निंग देतोय, इथून पुढे कोणाच्याही मुलीच्या भविष्याशी खेळू नको," असा इशाराही युनुस शेख यांनी दिला होता. "आव्हाडांनी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते पण शब्द फिरवला, ज्यामुळे ते पक्ष सोडून एआयएमआयएममध्ये गेले. 23 वर्षांची मैत्री आव्हाडांनी तोडली, पण आम्ही पाच नगरसेवक आणले आणि आव्हाडांना पराभूत करणे हेच लक्ष्य आहे," असंही युनुस शेख यांनी म्हटलं होतं.

मुंब्रा हिरवा करण्यावरुन आव्हाडांचा टोला

मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवण्याचा मानस सहर शेखने बोलून दाखवला होता. त्यावरून आव्हाड यांनी टोला लगावला आहे. "मुंब्रा तिरंगा आहे. हा देश तिरंगा आहे. हा महाराष्ट्र तिरंगा आहे," असं सूचक विधान आव्हाड यांनी केलं. एवढ्यावर न थांबता त्यांनी, "संविधानाने तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपोली या देशात आणून शकत नाही," असा स्पष्ट इशारा आव्हाड यांनी दिला. 

'शेर का शिकारी आया'वरुन आव्हाडांचा चिमटा

सध्या आव्हाडांविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी एमआयएमचा मुंब्र्यामध्ये जोरदार प्रयत्न सुरु आहे. यावरूनही त्यांनी सूचक विधान केलं आहे. "आजकाल गल्लीबोळात घोषणा देताना, 'कौन आया, कौन आया... शेर का शिकारी आया' असं ओरडतात. नवीन पोरं कल्पक असतात. कल्पक पोरांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना आहे," असं आव्हाड म्हणाले. 

'कैसा हरया...'वरही आव्हाड बोलले

सहरच्या व्हायरल झालेल्या 'कैसा हरया...' टीकेवरूनही आव्हाडांनी सुनावलं आहे. एखादी लहान मुलगी मिश्लिकपणे बोलत असेल तर तिची सोशल मीडियावर क्रेझ असेल. तिच्या बालिशपणाची चर्चा सोशल मीडियावर असली तरी तिच्या त्या वक्तव्याला फार काही अर्थ नाहीये, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, "म्हणजे माझी लहान मुलगी हसत हसत म्हणाली, चॉकलेट लाया... असं म्हणाली तर ते ही असेच व्हायरल होईल त्यात काही विशेष नाही," असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. "मी कुणाला काही सांगायला जात नाही. आव्हान दिलं तर दिलं ते त्यांचं काम असतं. आपण आपलं काम करत असतो. एखादी मुलगी मिश्कीलपणे बोलत असेल आणि तिच्या वक्तव्याची, बालिशपणाची क्रेझ असली तरी तिच्या वक्तव्याला काही अर्थ नाही. उद्या माझी लहान मुलगी हसत हसत म्हणाली चॉकलेट लाया तर ते सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होईल. यात मोठं असं काही नाही. जे काही झालं ते बालिश आहे," असं आव्हाड म्हणाले. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More