पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहारवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, संतापून ढकलला माईक अन् नंतर...

Ajit Pawar on Parth Pawar Land Deal: पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहारावर बोलणं अजित पवारांनी टाळलं आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांचे माईक ढकलून देत बोलण्यास नकार दिला.   

शिवराज यादव | Updated: Nov 6, 2025, 03:40 PM IST
पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहारवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, संतापून ढकलला माईक अन् नंतर...

Ajit Pawar on Parth Pawar Land Deal: राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारातील गैरप्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पार्थ पवार यांनी पुण्याजवळील महार वतन जमीन आयटी पार्कसाठी खरेदी करताना मुद्रांक शुल्कात कोट्यवधी रुपयांची माफी घेतली आणि नियमबाह्य फायदे घेतले. झी 24 तासने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर राज्यातील राजकारणात वादळ आलं आहे. या प्रकऱणावरुन अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान अजित पवार यांनी मात्र बोलणं टाळलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवार वरळीमधील डोम येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी कार्यक्रमातून बाहेर जाताना प्रसारमाध्यमांनी त्यांना पार्थ पवारांसंबंधी विचारलं. मात्र अजित पवार काही न बोलताच निघून गेले. इतकंच नाही तर ते संतापलेले पाहायला मिळालं. अजित पवार धावतच तेथून निघून गेले. 

नोंदणीच बेकायदा असल्याचा ठपका

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याची आणि मोलाची ४० एकर जागेचा बेकायदा व्यवहार करून मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करीत, पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने ही जागा खरेदी मुद्रांक शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बेकायदा दिसत असल्याचे दाखवून पुण्यातील उपनिबंधक रवींद्र तारुंना निलंबति करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुद्रक शुल्क विभागाने झी-२४ तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.

 

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.नक्की जमिनीचा व्यवहार कसा झाला, महार वतनाच्या जमिनीचे नियम फॉलो करण्यात आला का, मुद्रांक शुल्क देतावेळी कायद्याचे पालन करण्यात आले का? हे सर्व पाहिले जाणार आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?

कोरेगाव पार्क भागातील ही जमीन खरेदी करण्यासाठी पार्थ अजित पवार यांची कंपनी हा ग्राहक होता. पार्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपूत्र आहेत. पार्थ पवारांनी लोकसभा निवडणूक लढली आहे. बारामतीचं अजित पवारांचं सगळं राजकारण पार्थ पवार पाहतात. पार्थ पवारांच्या या कंपनीत त्यांचा भागीदारही साधासुधा माणूस नव्हता. त्यांचे पार्टनर असलेले दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामेभाऊ आहेत. दिग्विजय पाटील यांची एवढीच ओळख नाही. दिग्विजय हे माजी मंत्री राणा जगजितसिंहांचे चुलतभाऊ आहेत.

राज्य सरकारच्या धोरणाअंतर्गत माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमामध्ये एकूण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या कमीत कमी 25% एवढी अतिरिक्त स्थिर भांडवली गुंतवणूक केल्यास सदर गुंतवणुकीला विस्तार किंवा विविध करण प्रकल्प मानले जाईल व सदर घटक हा मुद्रांक शुल्क माफीस पात्र राहील. तसेच ज्या माहिती तंत्रज्ञान उद्यानांना संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून वैध प्रारंभ प्रमाणपत्र किंवा रे राम मंजुरी मिळाली असल्यास अशा माहिती तंत्रज्ञान उद्यानामध्ये स्थापित होणारे माहिती तंत्रज्ञान घटक हे मुद्रांक शुल्क सूट मिळण्यास पात्र असतील. असं हे धोरण आहे.

22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीनं आयटी पार्क उभारणार असल्याचा ठराव केला. या ठरावावर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या सह्या स्पष्टपणे पाहाता येतात. अवघ्या 2 दिवसांत म्हणजे 24 एप्रिलला अमेडिया कंपनीची ही फाईलवर राज्याच्या उद्योग संचलनालयानं स्टँप ड्युटी माफी मंजुरीची मोहोर उमटवली. पुढच्या अवघ्या 27 दिवसांत जमी खरेदीचा व्यवहार उरकण्यात आला. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेडिया कंपनी 22 एप्रिल 2025ला आयटी पार्क उभारणीचा ठराव करते. त्यानंतर अवघ्या 48 तासांत म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी कंपनीला उद्योग संचलनालय परवानगी देते. 48 तासांत कंपनी ठराव करते काय आणि उद्योग संचालनालय त्यावर अभ्यास करुन तो मंजूरही करते हे सगळं डोकं चक्रावून टाकणारं आहे.सरकारच्या उद्योग विभागाच्या धोरणाचा लाभ घेऊन सरकारकडून स्टँप ड्युटीत सवलत मिळवली. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More