Ladaki Bahin: लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले नाही तर त्या आम्हाला मतं देणार नाहीत, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. यानंतर विरोधकांनी सत्ताधा-यांवर सडकून टीका केलीय. लाडक्या बहिणींना पैसे दिले नाहीत तर त्या आम्हाला आगामी निवडणुकीत मतं देणार नाहीत, अशी भीती मुश्रीफ यांनी व्यक्त केलीय.
सत्ताधा-यांना लाडक्या बहिणींची भीती वाटू लागलीय का, असा प्रश्न निर्माण झालाय. कारण, योग्यवेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही दिले तर आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांची मतं मिळणार नाहीत, अशी भीती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलीय. लाडक्या बहिणींचे पैसै कमी केले जाणार नसल्याचंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय. मुश्रीफ यांनी हे वक्तव्य करून विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच दिलं. विधानसभेला पैसै देऊन लाडक्या बहिणींची मतं विकत घेतली, आता पुन्हा पैसे देऊनच मतं घ्यावी लागतील, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला टोला लगावला.
हसन मुश्रीफांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्यात. निवडणूक लक्षात घेऊनच ह्यांना लाडकी बहीण, भाऊ आठवतात, असा टोला शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी लगावलाय.हसन मुश्रीफ यांनी हे वक्तव्य केलं असलं तरी सत्ताधारी शिवसेनेनं मात्र या भूमिकेपासून अलिप्त राहणं पसंत केलं. अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आणि हसन मुश्रीफ यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांनी ही भूमिका अजितदादांसमोर मांडावी असा सल्ला शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात मतांचं भरघोस दान टाकलं.लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानंच पुन्हा सत्तेत आल्याची कबुलीही महायुतीच्या नेत्यांनी दिली. त्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं. मात्र मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय.
राज्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे 2100रुपयांचं आश्वासन सध्यातरी हवेत विरून गेलंय. त्यातच आता हसन मुश्रीफांनी लाडक्या बहिणींची भीती बोलून दाखवली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना नाराज करणं महायुतीला परवडणारं नाही, हेही खरंय.