Sharad Pawar on Raj Thackeray-Uddhav Thackeray alliance: राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंसंदर्भातील (Uddhav Thackeray) युतीबाबत विधान केल्यानंतर राज्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात चर्चेला सुरुवात झाली. राज ठाकरेंच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांना प्रतिसाद दिला असल्याने राज्याच्या राजकारणात नवी नांदी होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. या नव्या घडामोडीवर सर्वच पक्षातील राजकीय नेते व्यक्त होत असताना शरद पवार यांनीही त्यावर भाष्य केलं आहे.
शरद पवारांनी पुण्यात कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलनिजन्सचा वापर करण्यासंदर्भात भूमिका मांडली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यादरम्यान त्यांना पत्रकारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासंदर्भात सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारलं. त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर देत सांगितलं की, "चर्चा प्राथमिक असते. याची माहिती मला नाही. हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मी काही त्यांच्याशी बोललो नाही. त्यावर मी कसं भाष्य करू".
यावेळी त्यांना पवार कुटुंबही सतत एकत्र येत असल्यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, "जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. तुम्ही जो उसाच्या संदर्भात उत्पादन वाढीचा प्रश्न काढला त्याच्यावर आम्ही गेले वर्षभर काम करत आहोत. शेवटी सरकार आलं पाहिजे, सरकारमध्ये सहकार प्रतिनिधीशी बोलणं याच्यात काहीही चुकीची गोष्ट नाही".
दरम्यान कृषी क्षेत्रात एआय वापरण्यांसंदर्भात ते म्हणाले की, "गंमत अशी आहे, हे धोरण राबवलं जातं वस्तुस्थिती नाही. प्रतापराव पवार कृषीमंत्र्यांना भेटले. त्याचं महत्त्व त्यांना सांगितलं, त्यानंतर कृषीमंत्र्यांनी हे धोरण राबवाव असं सांगितलं असं कळालं आहे. याची सुरुवात बारामती मध्ये केली. याचा गेले वर्ष दोन वर्ष अभ्यास करत आहोत. हे तंत्रज्ञान शेती उपयोगी आहे. आमचा रस शेतीत आहे. जमिनीचा पोत राखणं, खताची गरज ओळखणं हे यामुळे शक्य आहे. शेतकऱ्यांनी याचा आपल्या शेतीत उपयोग करावा. राज्य सरकारच्या वतीने आणखी पाच पिकांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर जाहीर करण्यात आला याचा आनंद आहे".
राज्यातील पाणी संकटावर ते म्हणाले की, "माझ्या माहितीनुसार 43 टक्के आहे, पण तुम्ही म्हणता 38 टक्के आहे. काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. याच्या अगोदर देखील असं झालं होतं. ते काय आजच झालं नाही. माझी खात्री आहे शेतकरी सुद्धा पाण्याचा जपून वापर करतील. मे आणि जून असे दोन महिने काढायचे आहेत. काळजीपूर्वक पावले टाकावे लागतील".