Mahabaleshwar tourism festival: पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यांनी कायमच राज्यातील पर्यटकांचं भान हरपलं आहे. अशा या भागामध्ये महाबळेश्वर हे अनेकांच्याच आवडीचं पर्यटनस्थळ. घाटवाटा सर करत आणि डोंगरदऱ्यांच्या विहंगम दृश्याला न्हाहाळत महाबळेश्वरपर्यंत पोहोचल्यानंतर तेथील निसर्ग सातत्यानं नवी रुपं दाखवत असतो. दरवर्षी ऋतू कोणताही असो, इथं येणाऱ्यांची गर्दी दर दिवसागणिक वाढत असून, आता याच पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी जाहीर केला.
सहसा महाबळेश्वरमध्ये प्रवेश करत असताना पाचगणी किंवा मग पुढे एका टप्प्यावर इथं बाहेरून येणाऱ्या वाहनांकडून आणि प्रवाशांकडून माणसी तत्त्वावर टोलची रक्कम आकारली जाते. मात्र 2 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वरला प्रामुख्यानं महापर्यटन महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांना मात्र इथं टोलमाफी घोषित करण्यात आली आहे.
2 ते 4 मे या तीन दिवसांच्या कालावधीत महाबळेश्वरमध्ये तीन दिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्धाटन होणार आहे. 3 मे रोजी येथील साबणे रस्ता इथं एका विशेष सांस्कृतिक मिरवणुकीचं आयोजन केलं जाणार असून, यादरम्यान खाद्यसंस्कृतीचं दर्शनही पर्यटकाना घडणार आहे. समारोपाच्या दिवशी म्हणजेच 4 मे रोजी महाबळेश्वरला सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककला सादर केल्या जातील.
कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर इथं शंभरहून अधिक तंबू उभारण्यात येणार असून, वेण्णा तलावामध्ये पर्यटकांना नौकानयन आणि साहसी खेळांचा आनंदसुद्धा घेता येणार आहे. एका नव्या अंदाजात महाबळेश्वरची सफर या महोत्सवाच्या निमित्तानं घडणार असून, त्यासाठी पर्यटकांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्याहून महाबळेश्वर, सातारा, वाईच्या दिशेनं असंख्य प्रवासवेड्या मंडळींची पावलं वळत असल्यानं महोत्सवाच्या निमित्तानं जाहीर करण्यात आलेल्या या टोलमाफीचा या साऱ्यांनाच फायदा होणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे.