महाराष्ट्रात घडू शकते पहलगामसारखी घटना? 'या' जिल्ह्यात 700+ पाकिस्तान्यांचं बेकायदेशीर वास्तव्य

Pahalgam Terrorist Attack 700 Pakistani In Maharashtra: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर नरेंद्र मोदी यांनी भारतात राहणाऱ्या पाकिस्तानमधील नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचा इशारा दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 25, 2025, 08:01 AM IST
महाराष्ट्रात घडू शकते पहलगामसारखी घटना? 'या' जिल्ह्यात 700+ पाकिस्तान्यांचं बेकायदेशीर वास्तव्य
समोर आली धक्कादायक माहिती (प्रातिनिधिक फोटो)

Pahalgam Terrorist Attack 700 Pakistani In Maharashtra: काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेला 48 तासांचा अल्टीमेटम आज संपत आहे. असं असतानाच वाघा-अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांनी मायदेशी जाण्यासाठी गर्दी केली आहे. असं असतानाचा महाराष्ट्रातील जळगावमधूनही एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जळगावमध्ये पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य असल्याचं समोर आलं आहे. 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक भारताचा नागरिकत्व स्वीकारून जळगावमध्ये स्थायिक झाल्याची माहिती पुढे येत आहे. पाकिस्तानातून जळगावात आलेल्या व्यक्तींकडून शासनाच्या नियम व अटींची पालन होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 

पहलगामसारखी घटना घडू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली

पाकिस्तानातील 700 पेक्षा जास्त सिंधी बांधव जळगावमध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारून वास्तव्य करत असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान या नागरिकांकडून भारतीय नागरिकत्व स्वीकारल्यानंतरच्या शासनाच्या अटी शर्तींचा पालन केले जात नसून त्यामुळे भविष्यात पहलगामसारखी किंवा अनुचित घटना जळगाव जिल्ह्यात सुद्धा घडू शकते धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. 

काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर नरेंद्र मोदी यांनी भारतात राहणाऱ्या पाकिस्तानमधील नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचा इशारा दिला आहे. यानंतर जळगाव जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या तसेच स्थायिक झालेल्या पाकिस्तानी सिंधी समाज बांधवांचा मुद्दा चर्चेला आला आहे. जळगाव शहरात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानातून आलेले सिंधी समाज बांधव वास्तव्य करत असून त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारलं असल्याची बाब समोर आली आहे

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी जळगावत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार जळगाव शहरात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी सिंधी बांधव राहत असल्याचा समोर आलं होतं. संबंधितांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं, मात्र नागरिकत्व स्वीकारल्यानंतरच्या शासनाच्या सरकारच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचा संबंधित व्यक्तींकडून पालन होत नसल्याने धोका निर्माण होऊ शकतो असं गजानन मालपुरे यांनी म्हटलं आहे. राजकीय दबाव असल्यामुळे संबंधितांकडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील गजानन मालपुरे यांनी केला आहे. दरम्यान, संबंधित नियम अटींचं पालन करत नसल्यामुळे भविष्यात अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील गजानन मालपुरे यांनी उपस्थित केला आहे.

व्हिजा संपल्यानंतरही राहत असतील तर...

जळगावत वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबद्दल जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. जळगावमध्ये फिरण्यासाठी पाकिस्तानी नागरिक आले मात्र व्हिजाची मुदत संपूनही परतले नसून जळगावतच वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली आहे. ही गंभीर बाब असून असे लोक जळगावमध्ये सुद्धा घातपात घडवू शकतात अशी भीती जळगावचे भाजपा आमदार सुरेश भोळे यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. दरम्यान, या संदर्भातला सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. काही लोक व्हिजा संपल्यानंतर जर राहत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचे सुद्धा आमदार सुरेश गोळे यांनी सांगितलं आहे.

आदेशाप्रमाणे कारवाई केली जाईल

भारतात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यातून समोर आला, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सार्क व्हिजा, टुरिस्ट व्हिजा घेऊन आलेल्या नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचा आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे . या प्रकारानंतर जिल्हा पोलीस दल सक्रीय झालं असून जळगावमध्ये पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी तसेच चौकशी सुरू करण्यात आली आहे. 327 पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये टुरिस्ट व्हिजा घेऊन राहत असल्याची बाब समोर आली आहे, या संदर्भात शासनाचे कारवाई संदर्भातले जे आदेश येतील त्यानुसार संबंधितांवर कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी ही माहिती दिली. 

पोलीस घातपात घडण्याची वाट पाहत नाहीयेत ना?

व्हिजाची मुदत संपून आहे काही पाकिस्तानी जळगावमध्ये वास्तव्य करत असतील, भारताचं नागरिकत्व स्वीकारल्याने पाकिस्तानी जळगावमध्ये राहताना शासनाच्या नियमाच्या अटीचे पालन करत नसतील तर ही निश्चितच गंभीर बाब आहे. प्रशासनाकडून, पोलीस दलाकडून संबंधितांवर कारवाई का करण्यात आली नाही? पहलगाम प्रमाणेच जळगावमध्ये घातपात घडण्याची तर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन वाट तर पहात नाहीये ना? असा सवालसुद्धा आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. पहलगाम येथील गंभीरघटनेनंतर तसेच पंतप्रधान यांच्या सूचनेनंतर तरी आता या संबंधितांवर कारवाई होईल का? काय कारवाई होते? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.