Raj Thackeray News : मराठी माणूस जागा आहे की झोपलाय? UP, बिहारमधील लोकांचं आश्चर्य वाटतं म्हणत राज ठाकरे गर्जले...

Raj Thackeray News : आजच्या यशासाठी काय बर्बाद करताय समजत नाहीये यांना. सत्तेचा हावरटपणात महाराष्ट्राचं सत्वं गमावून बसतोय. झी 24तासशी संवाद साधताना राज ठाकरे यांची जळजळीत टीका.   

सायली पाटील | Updated: Jan 10, 2026, 01:08 PM IST
Raj Thackeray News : मराठी माणूस जागा आहे की झोपलाय? UP, बिहारमधील लोकांचं आश्चर्य वाटतं म्हणत राज ठाकरे गर्जले...
Raj Thackeray mns chief in To The Point With Kamlesh Sutar podcast mumbai maharashtra bmc election 2026

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच, 'शिवसेना आणि मनसेची युती झाली असं मी जाहीर करतो' असं म्हणत शिवसेनेच्या उबाठा पक्षासोबत युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब केलं आणि मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे यांनीसुद्धा कंबर कसली. प्रचारसभांपासून ते मुलाखतींपर्यंत राज ठाकरेंनी मतदारांना संबोधित केलं आणि याचदरम्यान झी 24 तासच्या To The Point With Kamlesh Sutar या विशेष मुलाखतपर पॉडकास्टमध्येसुद्धा त्यांनी हजेरी लावली. जिथं मराठी, महाराष्ट्र, मुंबईतील निवडणूक अशा अनेक मुद्द्यांवर चौफेर टीका केली. 

Add Zee News as a Preferred Source

शिवसेना आणि मनसेची युती झाली तेव्हा निर्वाणीची भाषा करण्यात आली,  यानंतर निवडणूक होणार नाही... असंही म्हटलं गेलं पण खरंच अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न विचारला असता, अशी परिस्थिती आहे म्हणूनच हे सर्व झालं! अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. 'हिंदी सक्तीचा निर्णय आला तेव्हा मी म्हटलं होतं की ही हिंदी सक्ती नसून, ते चाचपडत आहेत की मराठी माणूस जागा आहे की झोपलाय... त्याला काही वाटतंय का?' असं म्हणत हिंदी सक्तीचे आदेश 'वरून' आसे आणि तिथूनच हे सारं सुरू झालं असा घणाघात करत संपूर्ण राज्याचं स्वास्थ्य बिघडवायचं हे कोणते खेळ सुरुयेत? असा खडा सवाल केला. 

आपल्याला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांचं आश्चर्य वाटतं की ते हिंदीबद्दल बोलतात, असं म्हणताना 'अरे तुमची भोजपुरी आहे ना, बिहारच्या लोकांनो तुमची भाषा अवधी, मैथिली आहे ना? हिंदीच्या मागे काय लागता? स्वत:ची भाषा जपा ना... युपीतले चित्रपट मग भोजपुरीत का येतात हिंदीत का नाही  येत? इतकं प्रेम तर स्वत:च्या भाषेबद्दल असलं पाहिजे ना..' असा खरपूस समाचार राज ठाकरेंनी घेतला.  

 

धर्माचा आणि भाषेचा काय संबंध?

अनेकदा भाषेचा मुद्दा हिंदुत्वं किंवा देशप्रेमाचं जोडलं जातं, असा प्रश्न विचारला असता 'हे कोण जोडणारे? धर्माचा आणि भाषेचा काय संबंध? मराठी, गुजराती, तामिळ माणूस हिंदू नाही का? एक गोष्ट लक्षात घ्या हा देश नव्हताच, हे वेगवेगळ्या भाषा बोलणारे प्रांत आणि खरंतर देशच होते. हा युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाच आहे. मुघल, ब्रिटीश अनेक आक्रमणं आली. पण आपण कोणते सण साजरा करायचे सोडले का?'

मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा

मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची आठवण करून देत त्यासाठीच्या नियमांकडे ठाकरेंनी लक्ष वेधलं. साधारण 1500, 1800 वर्षं जुनी भाषा पाहिजे तरच अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. हिंदीला अजून 1500 वर्ष आहेत अजून अभिजात भाषेचा दर्जा लाभायला आणि तिच तुम्ही आमच्यावर लादताय? असा खोचक सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. आपला भाषेला विरोध नसून, ज्यावेळी ती लादण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मी नकार देणार असंही त्यांनी ठणकावून सांगताना केरळ आणि कर्नाटकातील भाषावादाकडे लक्ष वेधलं. 'आम्ही बोललं की तुम्ही देशाची एकता मध्ये आणणार आणि बाकीची राज्य भाषेवर बोलणार तेव्हा तो त्यांच्या भाषेचा मुद्दा आहे असं बोलणार... अरे व्हा!', अशा शब्दांत हिंदीसक्ती त्यांनी परतवून लावली. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More