)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं कमी करण्यात आली आहेत. पण, असं असतानाही मंत्र्यांच्या ताफ्यामागे पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांची वाहनं धावत असल्यानं, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेते, कार्यकर्त्यांना आवाहन केल आहे. त्यामुळं आता तरी नेत्यांचा ताफा कमी होईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर सरकारनं काटकसरीला सुरुवात केली आहे . खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाईकवरुन विधानभवन गाठलं होतं. एवढंच नाही तर सरकारी विमान न घेता प्रवासी विमानानं बंगळुरु दौरा केला.
मुख्यमंत्र्यांनी साधेपणा आणि काटकसरीनं काम सुरु केलं आहे. ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली असल्याचं सांगितलं जात आहे. ताफा मोठा दिसू नये याचीही ते खबरदारी घेताना दिसू लागले आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांनाही बजावलं. वाहनाच्या ताफ्यामागं वाहनं घेऊन येऊ नका असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनाही तसाच अनुभव आला होता. रामदास आठवलेंनी सूचना देऊनही त्यांच्या वाहनांचा ताफा लांबलचक झाल्याचं पाहायला मिळालं.
हे ही वाचा
शेवटी रामदास आठवलेंना स्पष्टीकरण द्यावं लागलं. आपली एकच कार असून त्यामागं कार्यकर्त्यांच्या पंचवीस कार होत्या असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री स्वतः काटकसर करतायेत दुसरीकडं मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्या आदेशाचं पालन करताना दिसत नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. शनिवारी रात्रीही ते भल्यामोठ्या ताफ्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर अनेक मंत्री काटकसर करत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांना पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय.
हे ही वाचा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, “मी एक प्रतिकात्मक कृती म्हणून दुचाकीवरून आलो आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आठवड्यामधून किमान एकदा तरी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करु शकता. मंत्र्यांनी हे सुनिश्चित करावे की आमदार आणि पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या दौऱ्यांदरम्यान गाड्यांमधून गर्दी करु नका असे फडणवीसांनी सांगितले.”