Ripe Mango Juice: उन्हाळा सुरु असून आंब्याचा सिझनदेखील सुरु झालाय. आमरस प्रेमींना सावध करणारी एक बातमी समोर आली आहे. तुमच्या वाटीत येणारा आमरस खरंच अस्सल ताज्या आंब्यांपासून बनलेला असेल याची काही खात्री नाही. पिवळाजर्द दिसणारा आमरस कदाचित सडक्या आंब्यांपासूनही बनवलेला असू शकतो. यामागे कारणही तसंच आहे. कारण नवी मुंबईत अशा एका गलिच्छ आमरस कारखान्याचा पर्दाफाश झालाय.
उन्हाळ्यात आमरस म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शहरात अनेकजण अगदी कितीही पैसे मोजून आमरस विकत आणतात आणि तो खातात. मात्र ही दृश्य बघितली तर पुन्हा तुम्ही बाजारातून आमरस विकत आणायचं धाडस करणार नाही. नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेनं धाड टाकली. तेव्हा अतिशय धक्कादायक दृश्य समोर आलं. एका चाळीतल्या खोलीत अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. याच सडक्या आंब्यांपासून आमरस बनवला जायचा. या आमरसचं श्रीजी या नावानं ब्रॅण्डिंग करुन नवी मुंबई आणि आसपासच्या शहरात विकलं जात होतं.
या सडलेल्या खराब झालेल्या आंब्यांसपासून रोज तब्बल 6 हजार लिटर आमरस बनवला जातो. धक्कादायक म्हणजे या आमरस बनविणाऱ्या कारखान्याकडे ना फूड लायसन्स ना गुमास्ता लायसन्स.. मात्र बिनबोभाट नागरिकांच्या आयुष्याशी खेळ सुरू होता.
मनसेनं या घाणेरड्या आमरस कारखान्याचा भांडाफोड केला. त्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिली मात्र मनपा अधिकारी कारवाईला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्यामुळं या अधिकाऱ्यांना कारवाई टाळण्यासाठी कोणती मलाई खाऊ घालण्यात आलीय. असा सवाल उपस्थित होतोय.
आजकाल कोणताही अन्नपदार्थ शुद्ध, चांगल्या प्रतिचा मिळेल याची कोणतीच खात्री नाही. चार पैसे कमावण्यासाठी असं घाणेरडं आमरस बनवून ते शेकडो घरात ताजं, रसायन आणि प्रिझर्वेटिव्ह विरहीत म्हणून विकलं जातंय. किमान आतातरी अशा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखाने आणि कंपन्यांवर तात्काळ कठोर केली जाणार असा सवाल आता नागरिकच विचारताहेत.