Riteish Deshmukh Slams Bageshwar Dham Sarkar: नागपूरमध्ये बागेश्वर यांनी केलेल्या विधानाचा समाचार अभिनेता रितेश देशमुखने घेतला असून त्याने थेट इशाराच दिला आहे. नेमकं तो काय म्हणालाय जाणून घ्या...

Riteish Deshmukh Slams Bageshwar Dham Sarkar: छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात मागील काही दिवसांमध्ये दोन मोठे वाद उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यापैकी पहिला वाद हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे आमदार संजय गायवकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या प्रकाशांना अर्वाच्य भाषेत धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्याने निर्माण झालेला होता. तर दुसरा वाद हा बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात बोलताना स्वामी रामदासांचा उल्लेख करत महाराजांनी हताश होऊन मुकूट स्वामी रामदासांच्या पायाशी ठेवल्याच्या दाव्याने झाला आहे. या वादावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता या वर अभिनेता रितेश देशमुखने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा 'राजे शिवाजी' हा बहुप्रतिक्षित चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त रितेश देशमुख व अभिनेत्री जेलिना देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी व महाआरतीसाठी शनिवारी सायंकाळी हजेरी लावली. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठाची मी बरीच महती ऐकली होती. त्यामुळे मी आज याठिकाणी येऊन दर्शन घेतले आहे. हे भव्यदिव्य मंदिर व या परिसरातील कलाकृती मधून महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्वांसमोर मांडला आहे. महाराजांच्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी एवढे भव्य मंदिर उभारले या बद्दल शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंद करतो, असं रितेश म्हणाला. या शक्तीपीठ ठिकाणी मी आज आलो भविष्यात येत राहणार अशी प्रतिक्रिया रितेश देशमुखने नोंदवली.
आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र महाराज बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पत्रकारांनी रितेशला विचारले असता, मी काही ऐकलेले नाही. मला ते विषय माहीत नाहीत, असे बोलत रितेश देशमुखने सदर प्रकरणांबद्दल कल्पना नसल्याचं सांगितलं. मात्र त्यावेळी रितेशने, "महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही," असेही स्पष्टपणे सांगितले.
'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून पुस्तकाच्या नावावर आक्षेप घेत अश्लील शिव्या दिल्या होत्या. हा प्रकार 23-24 एप्रिल 2026 च्या दरम्यान घडला आणि त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी 1988 मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे कोल्हापूरमध्ये राहणारे प्रकाशक प्रशांत आंबी यांना संजय गायकवाड यांनी मध्यरात्री सुमारे 12:52 वाजता फोन करून अर्वाच्य शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. या पुस्तकाच्या शीर्षकावरून गायकवाड संतापले होते. त्यांना वाटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ‘शिवाजी’ असं एकेरी वापरून अपमान केला जातोय. त्यांनी प्रशांत आंबी यांना धमकावताना, “तुला घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन,” असं म्हटल्याचं व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. तसेच आंबी यांनी जिवे मारण्याची धमकी देताना, “गोविंद पानसरेचं काय झालं ते तुला माहितीये ना? तुलाही तसंच करेन” असंही म्हटलं. पानसरे यांची 2025 मध्ये हत्या झाली होती.
24 एप्रिल 2026 रोजी नागपूर येथे ‘भारतदुर्गा मंदिर’च्या शिलान्यास समारंभात (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसर) धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील गुरू-शिष्य नात्याचा किस्सा सांगताना वादग्रस्त विधान केलं. “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले. एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढला आणि पायाशी ठेवला. म्हणाले, ‘मी आता थकलोय, युद्ध लढणार नाही. हे राज्य तुम्ही सांभाळा, राजपाट तुम्ही चालवा,’ असं बागेश्वर म्हणाले. पुढे बोलताना, "रामदास स्वामी म्हणाले, ‘ठीक आहे. शिष्याचा धर्म म्हणजे गुरूची आज्ञा पाळणं. म्हणून आता हे राज्य तूच चालव. मी तुझा गुरू आणि तू माझा शिष्य.’ असं म्हणून रामदास स्वामींनी मुकुट परत शिवरायांच्या डोक्यावर ठेवला," असं विधानही बागेश्वर यांनी केलं. या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे.