Shiv Sena : शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी 'सामना'तून भाजप, शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल

Shiv Sena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी शिंदे गट आणि भाजपवर 'सामना' संपादकीयमधून जोरदार वार करण्यात आलेत.  

Updated: Oct 5, 2022, 08:15 AM IST
Shiv Sena : शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी 'सामना'तून भाजप, शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल title=

मुंबई : Shiv Sena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी शिंदे गट आणि भाजपवर 'सामना' संपादकीयमधून (Saamana Editorial) जोरदार वार करण्यात आलेत. भाजप महाराष्ट्रातून नष्ट झालेला दिसेल, असे अग्रलेखातून म्हटले. 'तुमच्या छाताडावर बसून मुंबई जिंकूच', असा इशारा शिंदे गटाला दिला आहे. दरम्यान, राज्याच्या सत्तासंघर्षातला कळीचा मुद्दा ठरलेला दसरा मेळावा आज शिंदे गट आणि ठाकरे गट साजरा करत आहेत. एकमेकांवर शरसंधान, आरोप प्रत्यारोप, राजकीय तोफा आज शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर डागतील. त्याआधीच 'सामना'तून चांगला समाचार घेण्यात आला आहे.

काय म्हटलंय, सामना अग्रलेखात ?

रणमैदान सज्ज आहे! चलो शिवतीर्थ!

आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करु द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता आणि तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. 

‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल?

‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे! त्यामुळे जय नक्की आहे! आज विजयादशमी! अतिशय मोठा आनंदाचा आणि मांगल्याचा सण. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. मात्र या पवित्र मुहूर्ताची निवड काही नतद्रष्टांनी केली आहे ती महाराष्ट्र, मराठी एकजुटीत फूट पाडण्यासाठी. हिंदुत्वाची वज्रमूठ असलेली शिवसेना कमजोर करण्यासाठी काही लोकांनी आजचा मुहूर्त निवडला असला तरी शिवसेना ही काही लेचापेचांची संघटना नाही. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची शिवशक्तीच आहे. ही शिवशक्ती गेली छप्पन्न वर्षे शिवतीर्थावर सीमोल्लंघनासाठी उसळत असते. अनेक लाटा आणि कपट-कारस्थानांशी टक्कर देत शिवतीर्थावरील हे सीमोल्लंघन सुरूच राहिले आहे. 

ठाकरे यांनी दसऱ्याचाच दिवस का निवडला?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याचाच दिवस का निवडला? त्याला विशेष महत्त्व आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाने याच दिवशी दहा तोंडी रावणाचा वध केला होता. देवी दुर्गेने दहा दिवसांच्या घनघोर युद्धानंतर याच दिवशी महिषासुर नामक राक्षसाचा वध केला होता. या दिवशी सर्व अमंगल गोष्टींचा, कपट-कारस्थानांचा नाश होतो म्हणून विजयादशमीला आपल्या हिंदू संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. 

यंदाचा दसराही अशा रावणांचा, महिषासुरांचा नाश करणार आहे. रावण मारला गेला तो आजच्याच दिवशी. रावणाने स्वतःलाच देव समजण्याची मोठी चूक केली होती. त्या अहंकाराने त्याचा बळी घेतला. महाराष्ट्रात व देशात सध्या अशा अहंकाराच्या वावटळी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात आज सगळे काही विस्कटलेले आहे. एक राज्य गेले व दुसरे आले म्हणजे सर्व काही व्यवस्थित झाले असे म्हणता येत नाही. बहुमतातले सरकार पैसा आणि धमक्या देऊन पाडणे हे पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यासारखेच सोपे आहे असे काही लोकांना वाटत आहे, पण महाराष्ट्रातले नवे सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झाले आहे. 

महाराष्ट्राची अखंडता : सत्तेतला ‘मिंधे’ गट गप्प बसला 

भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदावर येताच काय जाहीर केले, ‘योग्य वेळ येताच विदर्भ हे स्वतंत्र राज्य करू.’ म्हणजे देशात इतर नवी राज्ये निर्माण होतील तेव्हा विदर्भाचा लचका तोडू असेच मनसुबे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचे आहेत आणि त्यावर सत्तेतला ‘मिंधे’ गट गप्प बसला आहे. 

महाराष्ट्राची अखंडता, मुंबईची महाराष्ट्राशी असलेली नाळ तोडायची असेल तर आधी शिवसेनेची वज्रमूठ तोडावी लागेल. त्याशिवाय महाराष्ट्रातून मुंबईचा लचका तोडता येणार नाही हे माहीत असल्यानेच एका ठरलेल्या कारस्थानानुसारच मुंबई-महाराष्ट्रातील घटना वेगाने घडत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग खेचून-पळवून गुजरातेत नेले जात आहेत. एक ‘वेदांता’च नाही, तर ‘ड्रग्ज पार्क’पासून अनेक प्रकल्प उद्योगपतींना फूस लावून, आमिषे दाखवून न्यायचे हे कसले लक्षण मानावे?

त्यांना गुजरातशिवाय काहीच दिसत नाही !

पाचेक लाख रोजगार त्यामुळे बुडाला. पंतप्रधान मोदी हे सध्या गुजरातच्या निवडणुकीत अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांना गुजरातशिवाय काहीच दिसत नाही. गुजरातला बदनाम करण्याचे व या राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक रोखण्याचे कारस्थान काही जणांनी रचल्याचे विधान आमच्या पंतप्रधानांनी करावे हे दुर्दैवच म्हणायला हवे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, ते गुजरातइतकेच महाराष्ट्राचे आहेत हे तत्त्व आम्ही तरी पाळतो. गुजरातचे ‘शहा’ हे मुंबई ताब्यात घेण्याची भाषा करतात. त्याआधी शिवसेनेला ‘पटक देंगे’ वगैरे झुंडशाहीची भाषा ते करीत होते. या ‘पटक’बाजीला ‘पुरून’ शिवसेना आज उभी आहे. 

गुजरातशी आमचा झगडा नाही. गुजरात महाराष्ट्राचे जुळे भावंडच आहे. नर्मदा शंकर नावाचे कवी सवाशे वर्षांपूर्वी होऊन गेले. ‘जय जय गर्वी गुजराथ’ असे काव्य त्याने लिहिले ते योग्यच आहे. त्या ‘गर्वी गुजरात’चे संरक्षण ‘बाबरी’ दंगलीनंतर शिवसेनेने केले. एक हिंदुत्व म्हणून शिवसेनेने ते कर्तव्य पार पाडले, पण त्या बांधवांच्या डोक्यात विष भिनविण्याचे काम गेल्या काही काळापासून सुरू आहे. ते महाराष्ट्र आणि गुजरातलाच नाही, तर देशालाच धोकादायक आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घेतले पाहिजे. संपूर्ण देशाचे वातावरण एका दबावाखाली, तणावाखाली आहे. ‘पीएफआय’सारख्या दहशतवादी विचारांच्या संघटनांचा बीमोड केला जात आहे, हे चांगलेच आहे. अशा प्रकारची विषवल्ली उपटून नष्टच केली पाहिजे.  

'बेकायदेशीर सरकार सत्तेवर'

महाराष्ट्राला मोडून, कमजोर करून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल? आज महाराष्ट्रात पूर्णपणे बेकायदेशीर सरकार सत्तेवर लादले गेले आहे. शिवसेनेसारख्या प्रखर हिंदुत्ववादी, महाराष्ट्र स्वाभिमानी संघटना मोडून टाकायच्या व त्यासाठी गद्दारांना बळ द्यायचे, याच हेतूने सर्व राजकारण चालले आहे. तसेच आज भाजपची पावले त्याच दिशेने पडत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांचे शिवतीर्थ मिळू नये यासाठी कारस्थाने झाली. शेवटी न्यायालयाने न्याय केला. ज्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे, मराठी अस्मितेचे रणशिंग फुंकले, महाराष्ट्र जागा केला, एक बलाढय़ संघटन उभे केले त्या शिवतीर्थावरच शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईंनी केले. मात्र आता शिवसेनेच्या पुढील लढय़ाच्या नव्या पर्वाला सुरुवात पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्याच या रणमैदानावरून होत आहे ही मोठी योगायोगाची गोष्ट आहे.