'आमच्या गुंडगिरीमुळेच आज तुम्ही सन्मानाने...', संजय राऊतांनी फडणवीसांना करुन दिली आठवण, '...तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता'

Sanjay Raut on Devendra Fadnavis: बाळासाहेबांनी ज्या संघर्षातून शिवसेना उभी केली त्याचा अभ्यास मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीसांनी करणं गरजेचं आहे असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 5, 2025, 10:11 AM IST
'आमच्या गुंडगिरीमुळेच आज तुम्ही सन्मानाने...', संजय राऊतांनी फडणवीसांना करुन दिली आठवण, '...तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता'

Sanjay Raut on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या आधी शिवसेनेचा जन्म झाला आहे. बाळासाहेबांनी ज्या संघर्षातून शिवसेना उभी केली त्याचा अभ्यास मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीसांनी करणं गरजेचं आहे. आज देवेंद्र फडणवीस मान ताठ करुन जे बोलत आहेत त्यामागे आमची गुंडगिरी कारणीभूत आहे असं प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठीसाठी आम्ही आग्रही आहोत, मात्र गुंडगिरी खपवून घेणार नाही अशा शब्दांत इशारा दिला होता. त्यावर बोलताना संजय राऊतांनी त्यांना शिवसैनिकांच्या संघर्षाची आठवण करुन दिली.

Add Zee News as a Preferred Source

"महाराष्ट्रात मराठी माणसाला सन्मानाने जगता यावं यासाठी केलेली विधायक गुंडगिरी यामुळेच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर सन्नामाने बसला आहात. शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी होऊ दिला नाही. प्रसंगी आम्ही संघर्ष केला. आमच्या शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगला. आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले. आतापर्यंतच्या बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि तुम्हीदेखील त्यात आहात. तुम्ही काय फार वेगळं करत आहात अशातला भाग नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही हेच केलं. बेळगावात आम्ही गेलो, तुम्ही नाही गेलात. मराठी माणसासाठी बेळगावमध्ये आमच्यावर खटले दाखल झाले. मुंबईत आमच्यावर खटले झालेत त्यामुळे फडणवीसांनी यावर कमीत कमी भाष्य केलं तर त्यांचा मान राखला जाईल," असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' विधानावरुन दिलेल्या स्पष्टीकरणावर ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील अत्यंत कच्चं मडकं आहेत. सध्याच्या राजकीय स्थितीला ते गोंधळले आहेत. त्यातून ते अशी विधानं करत आहेत. गुजरात पाकिस्तानात आहे असं आम्ही कुठे म्हणत आहोत. गुजरात, महाराष्ट्र कधीकाळी एकच होता हे एकनाथ शिंदेंना माहिती नाही. बडोदा हे गायकवाडांचं मराठा संस्थान आहे. संपूर्ण गुजरातवर भोसल्याचं राज्य होतं. म्हणून अमित शाह किंवा मोदी बडोद्याला गेल्यानंतर जय महाराष्ट्र म्हणत नाही. इंदूर, ग्वाल्हेर ही होळकर आणि शिंदेंची मराठी राज्यं आहेत. पेशवे पण तिेथेच गेले होते हे फडणवीसांना सांगू इच्छितो. इतिहास मलाही त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. अजूनही त्यांची राजघराणी आहेत म्हणून योगी आदित्यनाथ जय महाराष्ट्र नाही तर जय उत्तर प्रदेश म्हणतात. त्यामुळे उगाच सारवासारव करु नका. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा आपण प्रयत्न करत आहात". 

पुढे ते म्हणाले की, "खरं तर देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदेंना अडचणीत आणत आहेत. वारंवार अशा भूमिका घ्या असं उत्तेजन देत आहेत. गुजरातच्या बांधवांनी महाराष्ट्रात विकासकामं केली. मग संपत्ती, पैसे नाही का कमावले? उपकार करतात का? पारशी समाजाने सर्वात जास्त योगदान केलं आहे. असं बोलून मराठी माणसाचं अपमान करत आहात. ही मुंबई मराठी मजुरांच्या सैनिकांच्या गिरणी कामगारांच्या घामातून रक्तातून निर्माण झाली आहे.  शेठजींच्या पैशातून निर्माण झालेली नाही. एकनाथ शिदेंनी माफी मागायला हवी. त्यांची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीसांनीही माफी मागायला हवी. तुम्ही इथेच पैसे कमावताय, संपत्ती निर्माण करताय आणि त्या संपत्तीतून एखादा हॉल बांधला तर दादागिरी करुन दाखवता. तेदेखील शिंदेंच्या जीवावर...मग आम्ही गुंड आहोत". 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More