....तिघांना देण्यात आली 15 कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट, मंचावरुन वाचून दाखवली नावं

Raj Thackeray claims 15 Crore offer: महापालिका निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उमेदवारांच्या कुटुंबाला 15 कोटींची ऑफर देण्यात आली होती असा खळबळजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ठाण्यात शिवशक्तीच्या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे आण देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच गौतम अदानींनाही लक्ष्य केलं.   

शिवराज यादव | Updated: Jan 12, 2026, 10:10 PM IST
....तिघांना देण्यात आली 15 कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट, मंचावरुन वाचून दाखवली नावं

Raj Thackeray claims 15 Crore offer: महापालिका निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उमेदवारांच्या कुटुंबाला 15 कोटींची ऑफर देण्यात आली होती असा खळबळजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ठाण्यात शिवशक्तीच्या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे आण देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मतदार विकत घेण्यासाठी पाच हजार रुपये दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. तसंच यावेळी त्यांनी गौतम अदानींनाही लक्ष्य केलं. त्यांनी मतदारांना जर मतदान केंद्रावर दुबार मतदान करताना कोणी दिसलं तर थोबाडीत लगावण्याचं आवाहन केलं. 

Add Zee News as a Preferred Source

'पैसे घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही'

"निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. उद्या 5 वाजता प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घऱाघऱात पैसे वाटण्यास सुरुवात होईल. भाजपाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेंचे लोक पकडत आहेत असा प्रकार सुरु आहे. कल्याण डोंबिवलीमधील अनेक मतदारसंघात फिरलो. सगळ्या गोष्टी करुनही प्रचंड हवा आहे. आज घराघरात मतांसाठी 5 हजार रुपये वाटत आहेत. एका बाजूला विकास केला म्हणतात आणि पैसे वाटतात. मग काय विकास केला? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण पाच हजार रुपयांत मत विकून मुलाला, मुलीला काय शिकवत आहोत? ते उद्या समाजात जाणार तेव्हा काय म्हणतील, माझे बाप, आई विकले गेले म्हणून? पैशासाठी मत विकलं," अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. 

'कल्याण डोंबिवलीत गुलामांचा बाजार मांडला'

"त्या कल्याण डोंबिवलीतील गुलामांचा बाजार मांडला होता. महाराष्ट्रात 66 ठिकाणी पैसे देऊन, वाटून फॉर्म माघारी घेण्यास लावलं. त्या दिवशी नाशिकच्या सभेत मी बोललो होतो. वेडेपिसे  झाले आहेत. एका ठिकाणी छाननीदरम्यान एबी फॉर्म गिळून टाकला. तुम्ही इथपर्यंत गेला आता?सोलापुरात आमच्या माणसाचा खून झाला. फॉर्म मागे घेण्यासाठी सरकार इथपर्यंत चाललं आहे. पोलीस हताश, कोर्टाकडे पाहायलाच नको...हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरु आहेत," असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.

 
'...15 कोटींची ऑफर नाकारून उभे राहिले'

"मी फक्त काहींची नावं घेतो. शैलेश धात्रक, मनिषा धात्रक, पूजा धात्रक हे एकाच घरातील उमेदवार असून कल्पनाही करु शकत नाही इतकी त्यांना ऑफर आहे. 15 कोटींची ऑफर दिली आहे. असला बाजार मांडला आहे. ते 15 कोटींची ऑफर नाकारून उभे राहिले आहेत. नाकारणारे कुठे आणि 5 हजारात मतं विकणारे कुठे?," असा प्रश्न त्यांनी विचारला, 

'महाराष्ट्रभर पैसे वाटले आहेत, टकसाल आहे का?'

"राजश्री नाईक यांना 5 कोटींची ऑफर झाली, त्यांनीही नकार दिला. हे महाराष्ट्राचं स्वभिमानी रक्त आहे. सुशील आवटेंना 1 कोटींची ऑफ झाली होती, त्यांनीही नाकारली. अजून बरेच जण आहेत. कुठून येतोय हा पैसा? काय़ सुरु आहे? महाराष्ट्रभर पैसे वाटले आहेत. टकसाल आहे का?पैसे आले कुठून? कोणाला 5 , कोणाला 10 कोटी...काही पाहायलाच नको. ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे. अशी निवडणूक कधी पाहिली नाही. काही लगामच नाही या लोकांना. जे काय हवंय ते करायचं आहे. पोलिसात, कोर्टात जाऊन उपयोग नाही," असंही ते म्हणाले. 

'यांची हिंमत कशी होते?'

"त्या बदलापूरचं प्रकरण आम्ही बाहेर काढलं. मुख्य आरोपीचा काही कारण नसताना एन्काऊंटर केला, का कशासाठी? या नराधनांना ठार मारलं पाहिजे यात वाद नाही. पण काही गुपित होतं का? जर ते बाहेर आलं असतं तर काही समस्या होती का? सहआरोपीला स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाने स्विकाला. यांची हिंमत कशी होते? सहआरोपीला नगरेसवक पद देण्याची हिंमत होते कारण तुम्हाला गृहित धरलं आहे. आला तर 5 हजार तोंडावर फेकतील आणि विकत घेतील," अशी टीका त्यांनी केली. 

'फडणवीस मला बरा, चांगला माणूस वाटायचा'

"भुजबळांना जेलमध्ये टाकणारे हेच देंवेंद्र फडणवीस होते. मला बरा. चांगला माणूस वाटायचा. रसमलाई आली होती, तो सांगतोय मुंबई, महाराष्ट्राचा संबंध नाही. आणि ते म्हणतात असं काही बोलला नाही. त्याचा तो अर्थ होत नाही. मला वाटायचं त्यांना इंग्रजी कळतं. पण खोटं बोलत राहायचं, पण आता खोट्याचं खरं होणार नाही. मला कोणीतरी क्लिप पाठवली. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा? कोणासाठी, कशासाठी करत आहातय़  म्हणून मी काल म्हटलं हे हातावर बसलेले ससाणे आहेत. जाऊन फक्त पक्षी मारुन आणणे इतकंच यांचं काम आहे. स्वकियांचे घात करायचे आहेत. आमचेच लोक आमची वाट लावत आहेत," असा संताप त्यांनी व्यक्त केला. 

"काल अदानी प्रकऱण काढलं तर मिर्चा झोंबल्या. आणि राज ठाकरेंचं आणि गौतम अदानींचा फोटो दाखवला. माझ्या घरी रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्राही येऊन गेले आहेत. घरी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का मी?," असा प्रश्न त्यांनी विचारला. 

'अदानीशी मैत्री करण्याचा विषयच नाही'

"मी काल जे दाखवलं ते इतकं भयनाक भीषण आहे. ज्या वेळी या महाराष्ट्रात, मुंबई, ठाण्यावर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती वैगैरे पाहणार नाही. अदानीशी मैत्री करण्याचा विषयच नाही. मी इतका अडाणी नाही. ते काल दाखवलं त्याचं गांभीर्या समजून घ्या. हा माणूस कधी सिमेंटमध्ये नव्हता, आता दोन नंबरचा व्यापारी आहे. आज सगळी विमानतळं आहेत. हे जे डाव रचत आहेत त्याविरोधात इथळ्या गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. पण हे मुद्दामून गोष्टी करत आहेत. आता सहा ते आठ विमानतळं त्यांना दिली आहेत. नवी मुंबईचं सोडलं तर गौतम अदानीने एकही विमानतळ बांधलेलं नाही. गन पॉइंटवर ती आपल्याकडे घेतली आहेत. पोर्ट गुजरातमधील मुंद्रा फक्त एकच आहे. बाकी देशभरातील दुसऱ्यांची होती, गन पॉईंटवर मला हवी सांगितलं. या माणसाचं स्वतचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव. या एका गोष्टीवर माणूस देशभर पसरत गेला आहे. उद्या जर ही पोर्ट बंद झाली तर व्यापार ठप्प, वीज निर्माण करणारा गौतम अदानी गेला तर सगळे अंधारात. मग तक्रार कोणाकडे करायची?," असा प्रश्न त्यांनी विचारला. 

'भवितव्य अदानी ठरवणार'

"महिन्याभरापूर्वी इंडिगोच्या विमानाचा स्ट्राइक झाला. हवाई वाहतुकीमधील 65 टक्के हवाई वाहतूक इंडिगोकडे दिली आहे. त्यांनी स्ट्राइक केला, कारणं दिली नाही. अख्खा देश ठप्प झाला. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करु शकते. अदानींच्या हातात सिमेंट, वीज, विमानतळं, पोर्ट्स आहेत. उद्या जर हे भाव वाढवू लागले तर घरांच्या किमती वाढणार. तुमचं भवितव्य अदानी ठरवणार. ह एक माणूस या देशात फक्त 2014-2025 मध्ये 10 वर्षात मोठा होतो. इतका मोठा, श्रीमंत, उद्योग उभारलेला दुसरा माणूस नाही. टाटा, बिर्ला यांना 50, 100 वर्ष लागली," असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

'बाकीचे उद्योगपती मेले का?'

"मी काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवत कशाप्रकारे मतदान होत आहे दाखवलं. वाढवणला विमानतळ होत आहे. सांताक्रूझ विमानतळ नवी मुंबईला नेणार आणि नंतर विकायला काढणार. आता अदानीकडे आहे. या देशात उद्योगपती मोठे व्हावेत पण एक नाही तर सगळे. या देशात उद्योग, पैसा आला पाहिजे. रोजगार निर्माण होतो, त्यांची घऱं उभी राहतात. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. पण एकावरच मेहरबानी का हे विचारणारा आहे. बाकीचे उद्योगपती मेले का? मग या माणसाला पुढे करायचं आणि वेगळे डाव आखायचे. महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा भुगोल पाहा. वाढवणच्या पुढे लगेच गुजरात लागतं. ही आपली मराठी शहरं, याचा मराठी ठसा यांना पुसायचा आहे," असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. 

'जर वाजवायचे असतील तर ढोल लेझीमच वाजले पाहिजे'

"भाषावर प्रांतरचचना झाली तेव्हा प्रत्येत भाषेचं एक राज्य निर्माण झालं. 107 हुतात्म्यांच्या लढ्यानंतर मुंबई मिळाली. मुंबईत महाराष्ट्राची असतानाही ओरबाडत होते. प्रत्येक राज्याची एक भाषा, स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला नख लावत आहात. नवरात्रीच गरबा खेळला जातो. आपलेही लोक जातात. चांगली गोष्ट आहे. पण तो आनंदाचा, सणाचा विषय आहे. पण मुंबई विमानतळावर जेव्हा गौतम अदानीने ताब्यात घेतलं, तुम्हाला काय सांगायच होतं त्यातून ही कृती केली. मुंबई विमानतळावर गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची आहे. गणपतीमध्ये ढोल लेझीम वाजवले का? जर वाजवायचे असतील तर ढोल लेझीमच वाजले पाहिजे. ही मुंबई, ठाणे मराठी माणसाचं आहे. कपाट दुरुस्त करायला याचं आणि बाकोवर नजर टाकायची हे चालणार नाही," असं त्यांनी खडसावलं. 

'एकाच माणसावर इतकी मेहरबानी का? तो काय देत आहे?'

"घोडबंदरला एक हजार एक जमीन उद्योजकाला विकत आहेत. गणेश नाईकांना होऊ देणार नाही संगितलं ही आनंदाची बाब आहे. एकनाथ शिंदेंना हे करायचं आहे. त्यांच्या ओळखीतलाच आहे. जी दिसले ती जमीन घ्यायची आहे. वरुन पाठवणार आणि या उद्योगपतीला द्या सांगणार. ताडोबाची जमीन खाणींना दिली. उद्योगपती आला आणि सह्या द्यायला सांगितलं. जिथे गौतम अदानी पाहणार ती जमीन देत आहेत. एकाच माणसावर इतकी मेहरबानी का? तो काय देत आहे? ही सर्व शहरं गुजरातला मिळवायची आहेत. ठाणे, पालघर हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही. भौगोलिकदृष्ट्या काय सुरु आहे. त्यामुळे ते करत आहेत. आपण या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे," असं आवाहन त्यांनी केलं. 

'आम्हाला सत्तेची हौस नाही, पण डोळ्यांदेखत उद्धवस्त होऊ नये'

"ठाणे शहरात बाहेरु बदादबदा लोक येत आहेत. आम्ही आलो तर उत्तम सुखसोयी देऊ. तुम्ही असाल, तर टिकाल. उबंरठ्वार संकट य़ेऊन उभं आहे. कोणत्याही क्षणी दरवाजावर टकटक होईल. आज गाफील राहिलात तर कायमचे फसाल. महापालिकाही हातात गेल्या तर कोणाकडे जाणार. एकदा हातातून गेलं की परत येणार नाही. आज ती वेळ आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर उत्तम करु. हे ठाणं आपलं आहे. त्यांचा आराखडा उद्ध्वस्त करणं तुमच्या हातात आहे. पोलीस पालिकेत बाहेरची लोकं भरतील. तुम्हाला गृहित धरलं असून,  घरं असून तुमची किंमत नाहीत, त्यांचा आत्मविश्वास मोडून काढायचं आहे. आम्हाला सत्तेची हौस नाही, पण डोळ्यांदेखत उद्धवस्त होऊ नये, दुबार मतदान करायला आले तर तिथेच थोबडवा," असं आवाहन त्यांनी केलं. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More