कल्याण डोंबिवलीत पक्षाने शिंदेंना पाठिंबा दिल्याने राज ठाकरे व्यथित; संजय राऊतांना फोनवरुन म्हणाले 'मी सोडून जातो अशा...'

Sanjay Raut on MNS Alliance with Eknath Shinde in KDMC: कल्याण डोंबिवलीत पक्षाने एकनाथ शिंदेंच्या मनसेसोबत युती केल्याने राज ठाकरे व्यथित आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीचा विषय चिंताजनक आहे असंही ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 21, 2026, 05:35 PM IST
कल्याण डोंबिवलीत पक्षाने शिंदेंना पाठिंबा दिल्याने राज ठाकरे व्यथित; संजय राऊतांना फोनवरुन म्हणाले 'मी सोडून जातो अशा...'

Sanjay Raut on MNS Alliance with Eknath Shinde in KDMC: कल्याण डोंबिवलीत पक्षाने एकनाथ शिंदेंच्या मनसेसोबत युती केल्याने राज ठाकरे व्यथित आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीचा विषय चिंताजनक आहे असंही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. पक्षाच्या मूळ धोरणाशी प्रतारणा होऊन कोणत्याही पक्षाचं स्थानिक नेतृत्व विपरित भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

'गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही'

"आमची भूमिका फार वेगळी आणि कडवट आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरेंशी, मराठी माणसाशी गद्दारी, बेईमानी केली त्यांच्याशी राजकीय किंवा कोणतेही अन्य संबंध ठेवायचे नाहीत. गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही. सत्ता येते, जाते, आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. त्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहेत," असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

'कायदेशीरपणे त्यांना पक्षातून निलंबित केलं पाहिजे'

"कल्याण डोंबिवलीचा विषय चिंताजनक आहे. स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे असं म्हणत आहेत. पण पक्षाच्या मूळ धोरणाशी प्रतारणा होऊन कोणत्याही पक्षाचं स्थानिक नेतृत्व विपरित भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने कारवाई केली पाहिजे. कायदेशीरपणे त्यांना पक्षातून निलंबित केलं पाहिजे. काँग्रेसने अंबरनाथमध्ये भाजपासोबत जाणाऱ्या 12 जणांना ध्येय धोरणाशी प्रतारणा केल्यामुळे निलंबित केलं. स्थानकि पातळीवर निर्णय झाला असं सांगून विषय संपत नाही," अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ! उद्धव ठाकरेंसोबत लढल्यानंतरही मनसेचा शिंदेंना जाहीर पाठिंबा; राजू पाटील म्हणाले 'स्वार्थासाठी....'

'आमच्यासाठी शिंदे गट एमआयएम आहे'

"मनसे-शिवेसना एकत्र असताना एखाद्या चिन्हावर निवडून येत कोणी बेडूकउड्या मारत असेल तर पक्षाने, नेतृत्वाने कारवाई करुन महाराष्ट्राला या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं दाखवलं पाहिजे. राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे नेते उभे होते. शिंदे गटाचे लोक मनसे म्हणजे एमआयएम आहे का? असं विचारत आहेत. तर नाही, पण आमच्यासाठी शिंदे गट एमआयएम आहे. मराठी माणसातील एमआयएम, बेईमान, महाराष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणारेही त्या विशेषणांना पात्र ठरतात," अशी टीका त्यांनी केली आहे. 

'बेईमानी कऱणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही'

पुढे ते म्हणाले, "सत्ता मिळाली नाही म्हणून अशी बेईमानी कऱणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. तुमची काही वैयक्तिक कारणं असतील तर ती तेवढ्यापुरती मर्यादित ठेवायला हवी. काहींच्या मागे ईडी, तपास यंत्रणा लागल्या असतील. पण त्यासाठी पक्ष वेठीस धरणं आणि गद्दारांशी हातमिळवणी करणं चुकीचं आहे. मी ईडीचं संकट आल्यानंतर पक्षाला वेठीस धरलं नाही. मी त्या संकाटाचा सामना केला. आजही माझी तब्येत खराब आहे. आता मी ऑपरेशन थिएटरमधून आलो आहे". 

'उद्धव ठाकरेंनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला'

"उद्धव ठाकरेंनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. राज ठाकरेंशी चर्चा झाली आहे. काही मिळालं नाही, तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काहीजण असतात. राजकारणातील  मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असल्याचं ते म्हणाले आहेत," अशी माहिती त्यांनी दिली. 

'राज ठाकरे फार व्यथित'

"राज ठाकरे फार व्यथित आहेत. स्थानिकांनी व्यक्तिगत कारणांनी निर्णय घेतला आहे. ही माझ्या पक्षाची भूमिका नाही असं राज ठाकरेंच म्हणणं आहे. प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही, देण्याच्या स्थितीत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला आता पाहिजेच, नाही दिलं तर जातो हे मानसिक अस्थिरतेचं लक्षण आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे," असंही त्यांनी म्हटलं आहे. 

'पक्षांतर करणारे हे मानसिक रुग्ण'

"पक्षांतर करणारे हे मानसिक रुग्ण आहेत. मला आताच काहीतरी हवं आहे आणि मग शहर, गावाचा, राज्याचा, देशाचा, जगाचा विकास या नावाखाली पक्षांतरं वाढतील. महाराष्ट्रात अशा पक्षांतराची कीड वेळीस रोखणं न्यायालयाचं काम असतं. पण आज सर्वोच्च न्यायालयाने माती खाल्ली आहे. पक्षांतरासंदर्भात आज तारीख ठरवली असतानाही सुनावणी घेतली नाही याला म्हणतात माती खाणं आणि देशाच्या ऱ्हासाला हातभार लावणं," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. 

'मुंबईत असं होणार नाही'

मुंबईत असं होणार नाही. पण कल्याण डोंबिवलीत घडलं हे फार वाईट आहे. शेवटी महाराष्ट्राची स्तात देवेंद्र पडणवीस यांच्या हातात आहे. त्यांना हा निर्णय पटला नाही तर ज्या उदात्त हेतूने पक्षांतरं आणि पाठिंब्याची प्रकरणं घडली आहेत त्यांच्या मागे ससेमिरा लागू शकतो असा दावा त्यांनी केला आहे. 

'सुप्रीम कोर्टावरील विश्वास उडाला आहे'

"सुप्रीम कोर्ट वारंवार सुनावणी पुढे ढकलत आहे. या देशातील जनतेचा सुप्रीम कोर्टावरील विश्वास उडाला आहे. सुप्रीम कोर्ट राजकीय दबावात काम करत असेल तर, मग तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार? तुम्ही विकले आणि खऱेदी केली जाणारी संपत्ती आहे," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More