)
Vidhan Parishad Election 2026 Mahayuti Press Conference: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिंदे सेनेचे राहुल शेवाळे सहभागी झाले होते. बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी प्रत्यक्षात जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
"विधान परिषदेच्या निवडणुका 18 जूनला होऊ घातल्या आहेत. एक पोटनिवडणूक नागपूर आणि 16 परिषदेच्या निवडणुका आणि यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात एनडीए सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहे. तसेच राज्यातील सरकार देखील तसेच काम करत आहे," असं म्हणत रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. "तिघांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीनं शेतकरी श्रमिकांच्या हिताचे निर्णय घेताना दिसत आहेत. "विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वांनी मिळून निर्णय घेतला. परिषदेच्या निवडणुका महायुतीत लढल्या पाहिजे आणि म्हणून जागांचे वाटप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं याचा निर्णय गेल्या काही दिवसात घेतला," असं चव्हाण यांनी सांगितलं.
"1 तारखेला महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 4 तारखेला अर्ज मागे घेण्याचा वेळ आणि आणि ते मागे घेतले जातील अशी स्थिती आहे. मतदान त्या त्या ठिकाणचे नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती अशी सूची आहे. आयोगाने ही यादी डिक्लेअर केली आहे. या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात 17-17 जागा महायुतीच्याच उमेदवारांना विजय मिळाला पाहिजे म्हणून काल बैठक झाली. जे अधिकृत उमेदवार आहेत जे विजयी झाले पाहिजे त्यासाठी सूचना दिल्या आहेत. विजयाच्या दिशेने उमेदवार घेऊन जायचे आहेत. बरेच वर्ष काम करणारे कार्यकर्ते त्यांनी अर्ज भरले आहेत. अशात मतदारांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून महायुतीचे अधिकृत उमेदवार कोण हे आज आम्ही डिक्लेअर करत आहोत," असं म्हणत चव्हाण यांनी उमेदवारांची यादीच वाचून दाखवली. "मतदारांना विनंती आहे की पहिल्या पसंतीचे मतदान त्या त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला देणं अपेक्षित आहे. बंडखोरांनी अर्ज भरले असतील तर वरीष्ठांसोबत बोलून अर्ज मागे घ्यावेत. पार्टी येणाऱ्या काळात त्या उमेदवारांचा महामंडळं यासंदर्भात विचार करेल," असं आश्वासनही चव्हाण यांनी दिलं.
"सगळ्या निवडणुका जे मतदान आहे आणि गोळाबेरीज पाहिली तर महायुतीला 100 टक्के विजय मिळणार आहे. ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांच्यासोबत चर्चा करतच आहोत आणि बंडखोर दिसत आहे त्यांचे अर्ज मागे घेतले जातील आम्हाला खात्री आहे. अधिकृत उमेदवार कोण यांची घोषणा करावी यासाठी आलो आहोत. त्यामुळे पत्रकार परिषदेत सर्व विषयांची चर्चा करणं अपेक्षित नसतं. निकष विजयाचे आहेत. महायुतीत निर्णय प्रक्रिया ज्या होतात त्या निर्णय प्रक्रिया पत्रकार परिषदेत सांगण्याची सुरुवात झालेली नाही. अशी पद्धत चालू झाली की आपल्याला नक्की सांगू," असं म्हणत उमेदवार कसे निवडले गेले याबद्दलचा सविस्तर तपशील देण्यास चव्हाण यांनी नकार दिला.
"महायुती पत्रकार परिषदेचा हेतू आपल्या समोर ठेवला आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर निवडणुका झाल्या. नगरसेवक वगैरे नसल्याने निवडणुका रखडल्या होत्या. राज्यात निवडणुका झाल्या आणि आता तिन्ही नेत्यांनी पुढाकार घेतला. महायुती म्हणून लढवायची असा विचार झाला. देशात पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली सामर्थ्य वाढत आहे. एनडीए देशात राज्यात मजबूत असली पाहिजे. घटक पक्षांकडे समन्वय लक्ष असतं," असं सुनील तटकरे संवाद साधताना म्हणाले.
शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी, "विधान परिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवत आहोत. जागावाटपाचा निर्णय संयुक्तिक झाला आहे. महायुती भक्कम राहावी आणि तसा निर्णय आपण घेतला आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखालील आणि राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे जात आहोत. 17 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील. ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाईल. अधिकृत उमेदवार आहे त्यांच्या व्यतिरिक्त बंडखोर माघार घेतील याचा आम्हाला विश्वास आहे," असा विश्वास व्यक्त केला आहे.
नागपूर - राजीव पोतदार
भंडारा - अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर - गडचिरोली- अरुण लखानी
अमरावती - प्रवीण पोटे
सोलापूर - राजेंद्र राऊत
अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे
जळगाव - नंदकिशोर महाजन
सांगली सातारा - धैर्यशील कदम
नांदेड - अमर राजूरकर
धाराशिव - बीड - बसवराज पाटील
संभाजीनगर जालना - सुहास शिरसाट
ठाणे - रविंद्र फाटक
यवतमाळ- दुश्यंत चतुर्वेदी
परभणी - सय्यद खान
नाशिक - नरेंद्र दराडे
रायगड - अनिकेत तटकरे
पुणे - विक्रम काकडे