)
What Anil Parab Shown On Mobile: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवाचा छळ केल्याचा खळबळजनक आरोप करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केल्यानंतर या आरोपांना आज आमदार अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव घरीच ठेवलं होतं असा दावा केला. हा दावा खोडून काढतानाच अनिल परब यांनी रामदास कदमांवर टीका केली आहे. या वेळेस पत्रकारांशी चर्चा करताना अनिल परब यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक फोटो दाखवला. हा फोटो नेमका काय होता आणि त्याचा काय संदर्भ आहे जाणून घेऊयात...
रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचा दावा केला होता. हा दावा अनिल परबांनी खोडून काढला आहे. "बाळासाहेबांचा मृत्यू झाल्याचे सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम या सर्वांनी जाहीर केले. हे नेते होते म्हणून सर्वांसोबत होते," असं अनिल परब म्हणाले. बाळासाहेबांना कोणाला भेटू देत नव्हते असा दावा रामदास कदमांनी केला होता.
यासंदर्भात विचारलं असताना अनिल परब यांनी, "100 टक्के खोटे आहे. बाळासाहेबांना भेटायला प्रचंड गर्दी होती. कुठलाही मृतदेह शवपेटी शिवाय दोन दिवस ठेवता येईल का? रामदास कदमांची अक्कल गुडघ्यात आहे. तज्ञ डॅाक्टरांचे पथक होते तिथे आमच्यासोबत होते," असं उत्तर दिलं. तसेच पुढे बोलताना, "तेव्हा असा एक प्रस्ताव आला की अॅम्बूलन्सद्वारे मृतदेह नेवून पार्कात दर्शनासाठी ठेवायचे. पण नंतर निर्णय बदलून अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय झाला," असं अनिल परब म्हणाले.
पुढे बोलताना रामदास कदमांनी हाताचे ठसे घेतल्याचा जो आरोप केला त्यावरही अनिल परबांनी उत्तर दिलं आहे. "बाळासाहेब असताना त्यांच्या हाताचे त्यांनी मोल्ड बनवले होते. त्यानंतर हे मोल्ड वर्षा बंगल्यावरही होते. पंजाचा मोल्ड आहे. मोल्ड व ठशांमध्ये फरक आहे," असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. "अशा प्रकारचे ठसे घेवून स्वीस बँकेतून पैसे काढता येतात का?" असा सवाल अनिल परबांनी उपस्थित केला. हा सवाल विचारताना अनिल परब यांनी आपल्या मोबाईलमध्ये बाळासाहेबांनी हाताचा मोल्ड देतानाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये दाखवला.

यावेळेस बोलताना अनिल परब यांनी बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणात नार्को टेस्ट करण्याची मागणी पूर्ण करावी असं म्हणतानाच ज्योती रामदास कदम यांनी 1993 साली आत्महत्येचा जो प्रयत्न केला होता त्याची चौकशी रामदास कदमांचे पुत्र आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी करावी असा टोलाही लगावला. आईने जो आत्महत्येचा प्रयत्न केला त्याची चौकशी गृहराज्यमंत्री करणार का? असा सवाल अनिल परबांनी उपस्थित केला.