...म्हणून बँक पेटवली; छत्रपती संभाजीनगनमध्ये प्रत्यक्षात घडली चित्रपटापेक्षा डेंजर स्टोरी; पोलिसही शॉक झाले

छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक बातमी. दोन दिवसांपूर्वी वैजापूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आग लागली होती. चोरांनी गॅस कटरनं बँकेचं गेट तोडताना ही आग लागली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.. मात्र तपासात वेगळंच सत्य समोर आलंय ही आग लागली नाही तर लावण्यात आली होती. 

वनिता कांबळे | Updated: Apr 22, 2025, 06:49 PM IST
...म्हणून बँक पेटवली; छत्रपती संभाजीनगनमध्ये प्रत्यक्षात घडली चित्रपटापेक्षा डेंजर स्टोरी; पोलिसही शॉक झाले

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरातील वैजापुरात शनिवारी पहाटे महाराष्ट्र ग्रामीण बँकेला अचानक आग लागली. चोरीसाठी आलेल्या चोरांनी कटरनं बँकचं गेट कापताना ठिणगी उडून आग लागली असावी असा अंदाज सुरुवातीला पोलिसांनी बांधला. मात्र जसजसा तपास पुढे सरकर गेला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. 

कर्ज घोटाळ्याचे पुरावे नष्ट करायला एका बँक खातेदारानंच महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आग लावल्याचं वास्तव समोर आलं. मुख्य आरोपी भरत कदमनं आपल्या 5 साथिदारांसह अगदी फिल्मीस्टाईल स्टोरी रचून ही बँक पेटवली.
आरोपी भरत कदमनं खोटी कागदपत्र देऊन बँकेकडून 63 लाखांचे कर्ज घेतले होतं. ही बनवाबनवी कळल्यावर बँकेनं पोलिसात तक्रार करुन भरत कदमवर गुन्हा दाखल केला.  भरत कदमला अटक झाली त्याला काही दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं.

भरत कदमने खोटी कागदपत्र दाखवून 63 लाखांचं कर्ज घेतलं. बँकेकडून आरोपीविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली.  भरत कदमवर गुन्हा दाखल, काही दिवस तुरुंगवारीही झाली.  याचाच राग मनात धरून भरत कदमनं थेट बँक पेटवून द्यायचा प्लॅन आखला. यामुळं पोलीस तक्रार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा मिळेल, आणि कर्जाबाबतची खोटी कागदपत्रंही जळून खाक होतील आणि पुरावा नष्ट होईल असा त्याचा प्लॅन होता. आपल्या 5 साथिदारांसह त्यानं शनिवारी पहाटे बँकेकडे मोर्चा वळवला. आणि थेट बँक पेटवली.

बँक पेटवण्यासाठी आरोपी भरत कदमनं अगदी सिनेस्टाईल तयारी केली होती. गुन्हा करण्याआधी त्यानं मालेगाववरून एक सेकंड हॅन्ड कार विकत घेतली. कारला खोटी नंबर प्लेट लावली. घटनास्थळी गाडी कुणाच्या लक्षात येऊन नये म्हणून तिचा चेसिस नंबरही मिटवला.  मात्र खोटी नंबरप्लेट लावताना खरी नंबरप्लेट तो गाडीतच विसरला.. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी भरतच्या मुसक्या आवळल्या..

स्वत:च बँकेला 63 लाखांना फसवून, त्यासाठी तुरुंगवारी झाल्याचा राग मनात ठेवून बँकच पेटवून देण्याची घटना महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडली असावी..सुदैवानं यात बँकेतील रोख रकमेचं आणि कागदपत्रांचं फार मोठं नुकसान झालं नाही. मात्र एक गुन्हा लपवण्यासाठी आणि सूड घेण्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो त्याचं हे जळजळीत उदाहरण.