'ठाकरे बंधुंचा प्रचार शांत का वाटतोय?', उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; 'वातावरण तापलं नसेल पण...'

Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंचा प्रचार शांत झालाय का? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलंय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 8, 2026, 07:35 PM IST
'ठाकरे बंधुंचा प्रचार शांत का वाटतोय?', उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; 'वातावरण तापलं नसेल पण...'
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: हिंदी भाषेची जबरदस्ती आमच्यावर होऊ नये. घाटकोपरमध्ये गुजराती भाषा बोलण्याचा निर्णय ते घेतील आणि आम्ही ऐकावे? 1960 मध्ये गुजरातला मुंबईवर नजर होती, ती आजही कायम असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. झी 24 तासच्या 'टू द पॉइंट विथ कमलेश सुतार' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप सत्तेत आला तर मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे करेल, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ठाकरे बंधुंचा प्रचार शांत झालाय का? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलंय. 

Add Zee News as a Preferred Source

विकासकामे आणि भ्रष्टाचार

आम्ही कोस्टल रोड टोलमुक्त केला, पण उद्घाटनाचे श्रेय त्यांना मिळाले. आता भ्रष्टाचाराचे प्रदूषण सर्वत्र दिसते, धूळ आणि सिमेंटचे साम्राज्य पसरले आहे. चार वर्षांत तीन लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला. मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याचा बाप उधार घ्यावा लागतो. तुमच्या पूर्वजांचे नाव घेऊन मते मागा. मेट्रोची कामे काँग्रेसच्या काळात सुरू झाली. कोस्टल रोड, पाणीपुरवठा आणि धरणांची कामे आम्ही विक्रमी वेगाने पूर्ण केली. हे सर्व मुंबईच्या विकासासाठी होते, पण आता भ्रष्टाचाराने सर्व नष्ट होत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

मराठी दुहीचा फायदा

मराठी लोकांमधील भांडणाचा फायदा अब्दालीसारखे लोक घेतात. यांना आई-बापाचा ठावठिकाणाही माहीत नाही. ते मारामारी लावतात आणि सत्ता उपभोगतात. खरे शत्रू ते आहेत, पण माझी माणसे फोडून माझ्यावर दोष देतात. रक्तदानासाठी भाजपवाले येत नाहीत, पण गोमूत्र शिंपडायला येतात. मुंबईवर दोन श्रीमंतांचा कब्जा करायचा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठींवर गोळ्या झाडणारा मोरारजी देसाई गुजराती होता. त्याने गोळ्या वाया घालवू नका असे सांगितले. हा माणूस गुजरातचा होता. १९६० पासून मुंबईवर त्यांचा डोळा आहे. ते महाराष्ट्रातून मराठी संस्कृती संपवू इच्छितात आणि मराठी लोकांना बाहेर काढू इच्छितात,असे ठाकरे म्हणाले. 

भाजपचा मुंबईवर डोळा 

धारावीच्या माध्यमातून अर्धी मुंबई अदानींना दिली. आम्ही मोर्चे काढू, आंदोलने करू, पण अनेक कामे आदेशाने दिली जातात. आता पुन्हा मुंबईचे नाव बॉम्बे करतील. त्यांचा नेता आयआयटीमध्ये सांगून गेला. मुंबईत मराठी माणूस हळूहळू बाहेर पडत चालला आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर एअर इंडिया, एमटीएनएल सारख्या संस्थांमध्ये शिवसेनेने मराठींना नोकऱ्या दिल्या. मराठींवर अन्याय झाल्यास मनसे आणि आम्ही आंदोलने करतो, असेही ते म्हणाले. 

शिवसेनेची भूमिका

मुंबईवर अनेक संस्था राज्य करतात. धारावीमध्ये वर्षानुवर्षे लोक राहतात, पण ते त्यांना बाहेर काढणार आणि बाहेरच्यांना आत आणणार. शिवसेना मराठी ओळख जपण्यासाठी लढते. आम्ही पिढ्यानपिढ्या असलेल्या सर्वांना साथ देतो, पण बाहेरून येऊन दादागिरी करणाऱ्यांना विरोध करतो. मराठी संस्कृती आणि मुंबईचे रक्षण ही आमची प्राथमिकता असल्याचे ठाकरे म्हणाले.

'ठाकरे बंधुंचा प्रचार शांत का वाटतोय?'

यावेळेस आम्ही थोडा वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. गेले 2-3 दिवस माझा घसा बसला. सभा एकच मोठी घ्यायची. रविवारी शिवाजी पार्कात घेणार. लोक जे भोगतायत तेच आम्ही सांगतोय. आम्ही होर्डींग केलीय त्याची पुस्तिकादेखील केलीय. होय हे आम्ही केलंय.शिवसेनाप्रमुखांचा पुतळा प्रबोधन प्रकाशनाकडून आम्ही केला. मिंधे तोही पुतळा आम्ही केल्याचे सांगतायत. वातावरण तापलं नसेल पण अंडर करंट असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More