तिहेरी हत्याकांडाने खळबळ! मुंबईतील गजबजलेल्या परिसरात दोन कुटुंबात राडा, तिघांना जीव जाईस्तोवर मारले!

Mumbai Crime News: मुंबईत तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली असून यात अनेक जखमीदेखील झाले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 19, 2025, 08:35 AM IST
 तिहेरी हत्याकांडाने खळबळ! मुंबईतील गजबजलेल्या परिसरात दोन कुटुंबात राडा, तिघांना जीव जाईस्तोवर मारले!
clash broke out between two families in Mumbai’s dahisar 3 died

Mumbai Crime News: तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली आहे. दहिसर पश्चिम एम.एच. बी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबात तुफान राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ही घटना घडली आहे. दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीच्या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या वादातून झालेल्या या भांडणात चक्क चाकू आणि कोयत्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हल्लाने नंतर इतकं गंभीर घटनेत रुपांतर झाले की घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चौकशी करत आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

हमीद शेख (वय 49 वर्षे), रमणलाल गुप्ता (वय 50 वर्ष) आणि अरविंद गुप्ता (वय 23 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे असून हे सर्व गणपत पाटील नगर मधील रहिवाशी आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी दोन्ही बाजूने तुफान राडा झाला होता. याच राड्यामध्ये गणपत पाटील नगर परिसरात असलेला दुकानदारांकडून चाकू आणि कोयता घेऊन एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेख आणि गुप्ता या दोन्ही परिवारांमध्ये 2022 मध्ये क्रॉस गुन्हे दाखल होते. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होते. रविवारी 4.30 वाजण्याच्या सुमारास नवल गुप्ता याच्या नारळ विक्री स्टॉलसमोर अमित शेख हा दारू पिऊन आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. नंतर दोघांनीही आपापल्या मुलांना बोलवले. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्य आमने-सामने आले आणि दोन्ही गटात मारहाण सुरू झाली. 

या मारहाणीत राम नवल गुप्ता, अरविंद गुप्ता हे मयत झाले असून अमर गुप्ता व अमित गुप्ता जखमी झाले आहेत. तसेच हमीद शेख हे सुद्धा मयत झाले आहेच जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शताब्दी रुग्णालयातून मृतदेह पोस्टमार्टमकरिता पाठवण्यात आले आहे. तसंच, आरोपी जखमी असल्याने कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.