दादरच्या आणखी एका मराठी शाळेला टाळं! महाराष्ट्र दिनाआधीच मराठीची शोकांतिका

Dadar Nabar Guruji school Closed:  दादर पश्चिमेला असलेली इंडियन एज्युकेशन सोसायटीचे नाबर गुरुजी विद्यालय ही शाळा आता बंद होणार आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 29, 2025, 08:13 PM IST
दादरच्या आणखी एका मराठी शाळेला टाळं! महाराष्ट्र दिनाआधीच मराठीची शोकांतिका
मराठी शाळा

Dadar Nabar Guruji school Closed: गेल्या काही वर्षात मराठी शाळा झपाट्याने कमी होताना दिसताय. पटसंख्येअभावी मराठी शाळा विलीन कराव्या लागतायत अथवा कायमच्या बंद कराव्या लागतायत. 2 दिवसांनी आपण 1 मे रोजी संयुक्त महाराष्ट्र दिन साजरा करु. असे असताना दुसरीकडे मराठी शाळा बंद कराव्या लागणं ही शोकांतिका मानली जातेय. 

दादर पश्चिमेला असलेली इंडियन एज्युकेशन सोसायटीचे नाबर गुरुजी विद्यालय ही शाळा आता बंद होणार आहे. 30 एप्रिल हा शाळेचा शेवटचा दिवस असेल. पटसंख्या कमी होत असल्याने शाळा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलाय. दरम्यान मराठी शाळा बंद होत असल्याने सोशल मीडियात नाराजीचा सूर उमटत आहे. 

इंग्रजी ही काळाची गरज असे वाटून अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकणे पसंत करतात. यासर्वात आपल्या मायबोली मराठीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. 

नाबर गुरुजी विद्यालयाचे पटसंख्येअभावी प्राथमिकनंतर आता माध्यमिकचे वर्गही संकटात आले होते. या शाळेत यंदा दहावीला 24 विद्यार्थी शिक्षण घेत होते.  आता आठवी इयत्तेत 9 विद्यार्थी आणि नववी इयत्तेत 9 विद्यार्थी असे संपूर्ण शाळेत मिळून एकूण 18 विद्यार्थी उरले आहेत. त्यामुळे माध्यमिक विभाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

मराठी शाळा का बंद होतायत? 

मराठी शाळा बंद होण्यामागे कमी पटसंख्या हे मुख्य कारण आहे.  पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा अधिक आकर्षक वाटतात. इंग्रजी शिक्षण मुलांना जागतिक स्पर्धेत पुढे नेईल, असा पालकांचा समज आहे. मराठीत शिकल्याने मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळणार नाहीत किंवा ते जागतिक स्तरावर मागे राहतील, हा चुकीचा समज पालकांमध्ये आहे. यामुळे पालक आपल्या मुलांना इंग्रजी, सीबीएसई, किंवा आयसीएसई माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्यास प्राधान्य देतात. सरकारी धोरणे आणि अनुदानाचा अभाव हेदेखील मराठी शाळा कमी होण्यामागचे प्रमुख कारण आहे. सरकार कमी पटसंख्येच्या शाळांना शिक्षक आणि अनुदान देण्यास टाळाटाळ करते. संच मान्यतेच्या कठोर निकषांमुळे शिक्षकांची नियुक्ती होत नाही, ज्यामुळे शाळा अप्रत्यक्षपणे बंद पडतात. पालकांमध्ये  इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण वाढताना दिसतंय. सध्या 80% विद्यार्थी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये जातात, जिथे मराठी ही दुसरी भाषा म्हणून शिकवली जाते. यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व कमी होत आहे. शहरीकरण आणि स्थलांतरामुळेही मराठी शाळांवर परिणाम होताना दिसतोय. शहरी भागात मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मराठी शाळांचे प्रमाण कमी होत आहे, कारण लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देतात. तसेच, स्थलांतरामुळे गावातील शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होतेय.

उपाय काय?
मराठी शाळा टिकवायच्या असतील तर मराठी शिकवणे सर्व शाळांमध्ये सक्तीचे करणे, मराठी शाळांना आर्थिक आणि शैक्षणिक मदत देणे, पालकांमध्ये मराठी शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे.शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.