गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणार? उपमुख्यंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!

Mill Worker:  उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला.

प्रविण दाभोळकर | Updated: Jul 11, 2025, 08:15 AM IST
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणार? उपमुख्यंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!
गिरणी कामगार

Mill Worker:  गुरुवारी मुंबईतील विधानभवनात झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांसाठी एसआरए प्रकल्पांतर्गत काही घरे राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, शेलू येथे घरे घेण्याची सक्ती करणारा शासकीय आदेश (जीआर) रद्द करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली.बुधवारी गिरणी कामगारांनी घरांच्या मागणीसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ही बैठक पार पडली. यावेळी गिरणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.राजकारण करण्यापेक्षा महायुती सरकार गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी किती कटिबद्ध आहे, हे या बैठकीत स्पष्ट झाले.

Add Zee News as a Preferred Source

आझाद मैदान येथे गिरणी कामगारांच्या आंदोलनस्थळी आमदार उदय सामंत, आमदार सचिन अहिर, आमदार  प्रसाद लाड यांनी भेट दिली होती. गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर राजकारण न करता निर्णय घेण्याची विनंती यावेळी गिरणी कामगारांनी केली. गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत गिरणी कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला.

'मुंबईतच घरे हवी, शेलू-वांगणी नको'

शेलू येथे घरे देण्याचा पूर्वीचा निर्णय ऐच्छिक होता. मात्र, ती घरे न घेतल्यास कामगारांचा घराचा हक्क रद्द होईल, असा जीआर काढण्यात आला होता, जो आता रद्द करण्यात आला आहे. तसेच, मुंबई आणि जवळच्या परिसरात उपलब्ध जागांवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतल्याचे सामंत यांनी नमूद केले.

सेलू प्रकरणातील गैरसमज दूर

2024 मधील GR मधून निर्माण झालेला संभ्रम – “सेलू येथील घर नाकारल्यास कामगारांना दुसरीकडे घर मिळणार नाही” – हा GR मा. एकनाथ शिंदे साहेबांनी रद्द केला असून, तो अधिकृतरित्या डिलीट करून सुधारित पत्रक (शुद्धीपत्र) काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई किंवा मुंबई लगत घर देण्यावर भर

गिरणी कामगारांची दुसरी मोठी मागणी – मुंबई किंवा मुंबई लगत घरं मिळावीत – यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यातील SRA प्रकल्पांचे पुनरावलोकन करून त्यातून घरं देता येतील का, यावर चर्चा झाली.

नवीन ठिकाणांचा शोध व नियोजन

मीरा-भाईंदर, ठाणे, नवी ठाणे, मुंब्रा, अटल सेतू परिसर अशा ठिकाणी जागा उपलब्ध करून हजारो घरं देण्याचा सकारात्मक विचार बैठकीत झाला.

पनवेल प्रकरणात दिलासा?

पनवेलच्या कोनगाव येथील गिरणी कामगारांना घरं देण्यात आली होती. त्यातील 2019 पर्यंत घराची रक्कम भरलेल्या गिरणी कामगारांना दिलासा देण्यात आलाय. त्यांचा दोन वर्षांचा मेंटेनन्स खर्च माफ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला. 2019 नंतर घरांचा ताबा घेतलेल्यांना लावलेला 3500 रुपये इतका मेंटेनन्स कमी करण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. तसेच इथल्या इमारतींच्या डागडुजी आणि इतर प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा निघणे आवश्यक होते.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More