)
Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये विलिन होईल असा दावा करणारे खासदार संजय राऊत यांना भारतीय जनता पार्टीने खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमधून केलेल्या टीकेवरुन भाजपाने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
"एकनाथजी शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊतांना पोटसूळ उठला," असा टोला भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. "शिंदेंच्या दिल्ली भेटीने भाजप-शिंदे सरकार मजबूत झालंय, म्हणूनच राऊतांना पोटशूळ," असंही बन म्हणाले. "सोनियांच्या दारात तीन दिवस वाट बघणाऱ्यांना आता दिल्लीच्या गप्पा मारायचा अधिकार नाही," असा शाब्दिक चिमटा काढतानाच, "दिल्लीमध्ये सोनिया गांधींनी भेट दिली नाही, म्हणूनच राऊत आजही अस्वस्थ आहेत," असं बन यांनी म्हटलं.
निवडणूक चिन्ह आणि खरी शिवसेना कोणाची याबद्दल बोलताना बन यांनी, "जनतेनेच ठरवलं—धनुष्यबाण आणि खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांचीच," असं म्हणत सहकारी पक्षाची पाठराखण केली. "बाळासाहेबांच्या विचारांवर जनतेनं शिक्कामोर्तब केलं, सोनिया गांधींची सेवा करणाऱ्यांना महाराष्ट्राने नाकारलं! लोकशाहीच्या कोर्टात निकाल लागलाय — बाळासाहेबांची खरी वारसदारी शिंदे गटाकडे," असं बन म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर शिंदेंची सेना भाजपामध्ये विलिन होणार या विधानावरुन बन यांनी राऊतांना उत्तर दिलं. "महापालिकेनंतर ‘उबाठा गट’ काँग्रेसमध्ये जाणार, डील आधीच पक्कं झालंय," असं बन म्हणाले. "राहुल गांधींकडून राज्यसभा मिळवण्यासाठी राऊतांनी 'राजकीय सुपारी' घेतली असून ‘सेना वाचवायची’ म्हणून बोलणारे आता काँग्रेसच्या कुशीत आहेत," असं बन म्हणाले. "राऊतांचा खरा अजेंडा बाहेर—महापालिकेनंतर ‘उबाठा गट’ काँग्रेसमध्ये विलीन होईल," असा दावा बन यांनी केला. हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे आणि सत्याच्या मुद्द्यावरुन बोलताना, "सत्य हिंदुत्वासोबत आहे आणि हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहे!" असं बन म्हणाले. "सोनियाची गुलामी करणाऱ्यांना हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही! सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं — कारण सत्य हे बाळासाहेबांच्या विचारांमध्ये आहे! राऊत, तुमच्या हजार पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांचं हिंदुत्व मिटवू शकणार नाहीत," असा दावा बन यांनी केला.
एक नोव्हेंबरचा मोर्चा म्हणजे ‘फॅशन शो’ असल्याचा टोला बन यांनी लगावला. "एक नोव्हेंबरचा मोर्चा नाही, हा ‘फॅशन स्ट्रीट’चा फॅशन शो आहे. विधानसभा निवडणुकीत शो फ्लॉप झाला, आता पुन्हा त्याच नाटकाचा दुसरा भाग! मत चोरीच्या नावाखाली मोर्चा नव्हे, ‘पार्टी शो’—जनता पुन्हा फ्लॉप करेल.महाराष्ट्रातील जनता फॅशन शो करणाऱ्यांना महापालिकेतून घरचा रस्ता दाखवणार," असा टोला बन यांनी लगावला.