'तुम्ही इतकं घाण....', आयुष्यातील पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले 'नेत्यांना, मंत्र्यांना...'

Amit Thackeray on First Case registered: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावर त्यांच्या आयुष्यातला पहिला गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विनापरवानगी अनावरण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 17, 2025, 06:00 PM IST
'तुम्ही इतकं घाण....', आयुष्यातील पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले 'नेत्यांना, मंत्र्यांना...'

Amit Thackeray on First Case registered: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावर त्यांच्या आयुष्यातला पहिला गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विनापरवानगी अनावरण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी महाराजांसाठी गुन्हा दाखल झाल्याने आपल्याला फार बरं वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आता महाराजांच्या पुतळ्याभोवती लावलेला कपडाही पोलीस सुरक्षा कमी झाल्यानंतर आम्ही काढू असा इशारा त्यांनी दिला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे फक्त हसले असंही त्यांनी म्हटलं. 

Add Zee News as a Preferred Source

"महापालिकेला तीन दिवसांचा अल्टिमेट देऊयात असा सल्ला होता. मी म्हटलं मी केलं तर काय होईल. त्यावर त्यांनी केस होईल असं सांगितलं.. पण महाराजांसाठी केस होत असेल तर काय समस्या आहे आजच करुन टाकू असं म्हटलं. आपण अल्टिमेटम देणार, नंतर पोलीस सुरक्षा लागणार. महाराजांना घाणेरड्या कपड्यात गुंडाळलं असेल तर आजच करुन टाकू असं मी म्हटलं. सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन, त्यांनी उत्तम काम केलं. माझ्याविरोधात महाराजांसाठी एफआयआर झाला याबद्दल बरं वाटलं," असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या पोस्टबद्दल अमित ठाकरे यांनी त्यांचे आभारही मानले. मी त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक मराठी माणूस महाराजांसाठी पेटून उठतो. आपण त्यात राजकारण पाहत नाही. आदित्य ठाकरेंनी कौतुक केल्याचं मला आवडलं असं ते म्हणाले. 

"पुतळ्याचं अनावरण चार महिने का रखडलंय हे मलाही माहिती नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळ उद्धाटनासाठी, अनेक पक्ष प्रवेशांसाठी गेले. पण येथे का गेले नाहीत हे मला कळलं नाही. पुतळा गुंडाळून ठेवला आहे, आम्ही तो पुन्हा उघडणार. तुमच्या नेत्यांना, मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून काय तुम्ही बंद करुन ठेवणार. महापालिकेने स्वतहून हे करावं," असंही ते स्पष्टपणे म्हणाले. मी उद्घाटन करणं कदाचित माझ्या भाग्यात होतं असंही त्यांनी सांगितलं. 

तुम्हाला वेळ नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी पाठवा. हा अपमानच आहे ते फडकं इतकं घाण होतं असा संताप त्यांनी व्यक्त केला. 

पोलिसांनी दादागिरी केली का? असं विचारलं असता ते म्हणाले, "पोलिसांचं ते काम आहे. त्यांना काही बोलणार नाही. त्यांच्यावर अधिकारी, मंत्री असतात, त्यांनी थांबवलं. म्हणून तीन दिवसांचं अल्टिमेटम न देता लगेच झालं पाहिजे असं वाटलं. पोलिसांना त्रास देऊन काही करायचं नाही, पण ते महाराज आहेत". 

अनावरण केल्यानंतर आम्हाला काही काम शिल्लक आहे असं दिसलं नाही. जर शिल्लक होतं तर 4 महिने का थांबवलं? उगाच कारणं दिली आहेत. मी खपवून घेणार नाही. पोलीस सुरक्षा कमी झाल्यानंतरर आम्ही कपडा काढू असा इशारा त्यांनी दिला आहे. 

महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी तो अडवून ठेवता येणार नाही. तुम्हाला वेळ नसेल तर आम्ही उघडू. आम्ही श्रेय घेत नसून लोकांना उपलब्ध करुन देत आहेय. मी राज साहेबांच्या घरात वाढलो असल्याने कोर्ट वैगेरे माहिती आहे असंही ते म्हणाले. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More