Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सुकर आणि आरामदायी होणार आहे. मुंबई लोकल आणखी अद्यावत व्हावी यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे काम अगदी जोमात सुरू आहेत. लवकरच पनवेल ते बोरीवली प्रवास सुस्साट होणार आहे.
बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता थेट मुंबई उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकल उपलब्ध होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 'एमयूटीपी ३ ब'मध्ये पनवेल-वसई उपनगरी रेल्वे प्रकल्पाचा समावेश केला आहे. पनवेल-वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बेरिवली-विरारपर्यंत करणे शक्य होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या 'एमयूटीपी ३ ब' प्रकल्पसंचामध्ये नवीन पनवेल-वसई उपनगरी रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. वसईपासून पुढे बोरिवली आणि विरार अशा दोन्ही दिशांना याची जोडणी असणार आहे. 'एमयूटीपी' अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पात राज्य आणि केंद्र सरकारकडून ५०:५० प्रमाणे निधी दिला जातो. नवीन पनवेल-वसई लोकल मार्ग सुरू करण्याबाबत सविस्तर प्रकल्प
अहवाल करण्यात (डीपीआर) तयार आला आहे.
या प्रकल्पाबाबत राज्य सरकारशी प्राथमिक बैठका पार पडल्या आहेत. महामुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद करणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. महामुंबईत केवळ पनवेल-दिवा-वसई मार्गावर मुंबई लोकल धावत नाही. सध्या मेमू रेल्वे धावत असून, त्याच्या मोजक्याच फेऱ्या होतात. यामुळे पनवेल-वसई लोकल सुरू करण्याची मागणी सातत्याने प्रवाशांनी लावून धरली आहे, लोकल सुरू झाल्यानंतर या परिसरातील वेगवान विकासाचा मार्ग प्रशस्त होणार आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे
नवी मुंबईतील नव्या विमानतळापासून पनवेल रेल्वे स्थानक सुमारे १० मिनिटांच्या अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलपर्यंत हार्बर लोकल धावते. पनवेल-कर्जत नव्या रेल्वे प्रकल्पात सध्या रुळांची उभारणी सुरू आहे. मेट्रो ८मुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यान मेट्रोचा पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वेसह मेट्रोची जोडणी असल्याने रेल्वे प्रवाशांसह विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही याचा लाभ घेता येणार आहे. पनवेल-बोरिवली लोकल झाल्यानंतर वसईतील नागरिकांनाही नवी मुंबई विमानतळावर पोहोचणे सोप्प होणार आहे.