मुंबईत पूल दुर्घटनेवेळी सिग्नल लागला नसता तर...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली.  या ठिकाणचा सिग्नल पडल्याने मोठी दुर्घटना टळली.  

Updated: Mar 14, 2019, 09:29 PM IST
मुंबईत पूल दुर्घटनेवेळी सिग्नल लागला नसता तर... title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात दुर्घटनेत तीन ठार तर ३४ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅबच खाली कोसळल्याने त्यात तिघांचा मृत्यू झाला. तसेच या पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे मुंबई बाहेर जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. तसेच या ठिकाणचा सिग्नल पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सिग्नल पडल्यामुळे अनेक वाहने सिग्नलजवळ उभी होती. त्यामुळे दुर्घटना घडली. त्यावेळी वाहने पुढे गेली नाहीत, अन्यथा या ठिकाणी वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ही दुर्घटना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ रस्ता बंद केला. त्यामुळे मुंबईहून दादरच्या दिशेने जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या दुर्घटनेनंतर पुलाचा कोसळलेला ढिगारा बाजुला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक जण पुलाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सायंकाळी कामावरून सुटल्याने अनेक जण आणि मुंबई चाकरमानी हिमालया पुलावरून जात असताना अचानक हा पूल कोसळला. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने त्याबरोबर पुलावरून चालणारे चाकरमानीही खाली कोसळले. पूल कोसळल्यानंतर जोरदार आवाज आल्याने एकच घबराट पसरली. 

या पुलाचा स्लॅब एका टॅक्सीवर कोसळल्याने या टॅक्सीचा चेंदामेदा झाला. पूल कोसळल्यामुळे पुलाखालून जाणारी वाहतूकही तात्काळ थांबवण्यात आली. सीएसटी परिसरातील पादचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. दरम्यान, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ठार झालेल्या अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या दोघीही जीटी हॉस्पिटलमधील परिचारीका होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घटनेत ३४ जण गंभीर जखमी असून १४ जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात आणि २० जणांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.