बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

अनेक वर्ष रखडलेल्या बीडीडी चाळींच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रश्नी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. 

Updated: Sep 5, 2020, 10:19 AM IST
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश  title=
संग्रहित छाया

मुंबई : अनेक वर्ष रखडलेल्या बीडीडी चाळींच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रश्नी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा यादृष्टीने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे  बैठक घेतली. या  बैठकीत पुनर्विकासाबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारी देखील उपस्थित होते.

वरळी येथे बीडीडी चाळीत ९६०० भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करून विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. याकामी महसूल विभागाकडून आवश्यक तेवढे उपजिल्हाधिकारी किंवा नायब तहसीलदार नियुक्त करण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले.

ना. म. जोशी मार्ग येथे ३२ चाळी असून २५०० भाडेकरू आहेत तर नायगाव येथे ४२ चाळी आणि ३३०० भाडेकरू आहेत. तेथील पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या तातडीने दूर करून विकासास सुरुवात करावी तसेच भाडेकरूंचे योग्य स्थलांतर करावे असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

यासंदर्भात गृहनिर्माण प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास यांनी प्रारंभी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत वस्तुस्थिती सांगितली.  तसेच या प्रकल्पांची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला असून त्याबाबतही येणाऱ्या अडचणींचा उहापोह त्यांनी केला. सर्वसामान्यांना घरे मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी या सर्व अडचणी दूर करून कालबद्ध रीतीने पुनर्विकास मार्गी लावावा व याबाबत दर काही दिवसांनी आढावा घेत राहावा अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.