Pahalgam Attack: 'दोन धर्मांना एकमेकांसमोर...', वड्डेटीवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'इंटेलिजन्स काय...'

Vijay Wadettiwar On Pahalgam Terror Attack: पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे नेते असलेल्या वड्डेटीवार यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 23, 2025, 12:23 PM IST
Pahalgam Attack: 'दोन धर्मांना एकमेकांसमोर...', वड्डेटीवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'इंटेलिजन्स काय...'
पत्रकारांशी बोलताना वड्डेटीवार यांनी नोंदवलं मत

Vijay Wadettiwar On Pahalgam Terror Attack: आम्ही हल्ल्याचा निषेध करतो. हा भारत देशावरचा हल्ला आहे, असं प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी नोंदवली आहे. इथे राजकारणचा विषय नाही. पण हा हल्ला म्हणजे इंटेलिजन्सचे अपयश आहे, असंही वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे. "दहशतवाद्यांना रान मोकळे केले असा हा सगळा प्रकार आहे. इंटेलिजन्स काय करत होते? हजारो पर्यटक जिथं होते मग तिथं एकही पोलीस किंवा सुरक्षा रक्षक कसा काय नव्हता?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 

...पण दहशतवाद संपला नाही

"सुरक्षेसंदर्भातील व्यवस्था करणे गरजेच होते. ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी टार्गेट करून गोळीबार केला ते भयानक आहे," असं मत वड्डेटीवार यांनी व्यक्त केलं आहे. "जम्मू-काश्मीरमधून हिंदूंचे पलायन होत आहे मग नोटबंदी झाली आणि बोलले जात होते की दहशतवाद संपेल पण संपला नाही. हे सरकारचे अपयश आहे," असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे. 

प्रवाशांना सुरक्षितपणे काढा

वड्डेटीवार यांनी या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे तिथून काढले पाहिजे, असं म्हटलं आहे. मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात तिथे सुरक्षा बंदोबस्त असायला हवा, अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी, "दोन धर्मांना एकमेकांसमोर उभे करण्याचा हा डाव असू शकतो," अशी शक्यताही व्यक्त केली आहे.

राहुल गांधी दौरा अर्धवट सोडून परतणार

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या राहुल गांधींनी आपला दौरा अर्ध्यात रद्द करुन परतणार आहेत. सध्या ते या हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत भाजप करणार निषेध

मुंबई उपनगरसह पालकमंत्री मंगल प्रभात लोढांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई भाजपा काश्मीरच्या पहेलगाममधील घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहे. आज सायंकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटी येथे निषेध आंदोलन केलं जाणार आहे. या भ्याड हल्ल्याविरोधात शहीद तुकाराम ओंबळे चौकात आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाने केलं आहे.