Sanjay Raut On Pahalgam Terror Attack Latest News: काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत 28 पर्यटकांचे प्राण घेतले तर अनेकांना जखमी केलं. या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी सायंकाळीच विशेष विमानाने काश्मीरला रवाना झाला. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शाहांनी राज भवनामध्ये विशेष बैठकही घेतली. या हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिका दौरा अर्धवट सोडून भारतात परतलेत. दिल्लीमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. असं असतानाच आता या हल्ल्यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन अमित शाहांचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अमित शाहांबरोबरच संयुक्त राष्ट्र आणि भारतीय जनता पार्टीच्या अकाऊंटलाही टॅग केलं आहे. अमित शाहांचा फोटो पोस्ट करत राऊतांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमित शाहांचा सर्व वेळ सरकारं बनवण्यात आणि पाडण्यात जात असून त्यांचा मेंदू 365 दिवस विरोधकांना संपवण्यासंदर्भातील कट रचण्यात व्यस्त असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
"राजीनामा द्या! संपूर्ण वेळ केवळ सरकारं बनवण्यात आणि पाडण्यात जातोय. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी कट रचण्यामध्ये 365 दिवस मेंदू व्यस्त असतो. लोकांची सुरक्षा राम भरोसे आहे. आता रामसुद्धा या लोकांना कंटाळला आहे. राजीनामा द्या, देशावर उपकार करा," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
नक्की वाचा >> 'बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र...', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'केंद्र सरकारने आता असा...'
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांना राज्यात परत आणण्याच्या व्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान शिंदे यांनी नायडू यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची विनंती केली. विनंती स्वीकारून नायडू यांनी आश्वासन दिले की अडकलेल्या पर्यटकांची यादी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्याची व्यवस्था केली जाईल. उपमुख्यमंत्री विनंती मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.