मुंबई :  महाराष्ट्रात एका रात्रीत राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येत मंत्रीपदाची शपथ घेतली. एकीकडे महाविकासआघाडीची सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु असताना हा शपथविधी झाला. या सगळ्या घटनेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. शरद पवार यांच्यासोबत सकाळी अजित पवार यांच्यासोबत राजभवनावर असलेले काही आमदार देखील उपस्थित होते. आम्हाला काही सांगण्यात आलं नसल्याचं या आमदारांनी यावेळी म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार


'महाविकासआघाडीकडे १५६ आणि काही अपक्षांचा पाठिंबा आहे. सकाळी राजभवनावर राष्ट्रवादीचे काही जण गेल्याचं कळालं. काही वेळेतच देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. राष्ट्रवादीच्या धोरणाविरोधात अजित पवार गेले. पक्षाचे सदस्य १० ते ११ सदस्य सहभागी झाले होते. त्यापैकी ६-७ आमदार अजित पवारांसोबत आहेत. हा सगळा प्रकार घडल्यानंतर काही जणांनी संपर्क साधायला सुरुवात केली. जे सदस्य पक्ष विरोधी गेले आहेत. त्यांचा पुन्हा पराभव करु. त्यांच्या विरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचा संयुक्त उमेदवार देऊ.'


'अजित पवार यांनी विधीमंडळाचा अध्यक्ष म्हणून आमदारांची सह्या असलेली यादी नेली. या यादीमुळेच राज्यपालांना आपल्याला ५४ आमदारांचा पाठिंबा असल्याचं भासवलं गेलं असेल. पण आम्ही सगळे एकत्र आहोत. एकत्र राहणार, कसंही संकट आलं तरी एकत्रित राहू असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.


'राष्ट्रवादीचे प्रामाणिक कार्यकर्ते अजित पवारांसोबत जाणार नाहीत. राष्ट्रवादीची थोड्या वेळेत बैठक होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचा नवा नेता ठरवला जाणार आहे. सरकार आम्हीच बनवणार आहे. राजकारण वेगळं असतं आणि कुटुंब वेगळं' असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे.


उद्धव ठाकरे


'आपल्या देशामध्ये लोकशाहीचा खेळ सुरु आहे. नवा हिंदुत्व आणि जनादेशाची काळजी करणारे नवे लोकं आले आहेत. जनादेशाचा अपमान केला असा आरोप आमच्यावर केला जातोय. पण आम्ही करतो ते दिवसाढवळ्या करतो. रात्री नाही करत. बिहार, हरियाणामध्ये झालं ते महाराष्ट्रात का चालत नाही. केंद्रीय मंत्रीमंडळाची पहाटे बैठक झाली. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी जशी ही बैठक होती. पण आम्ही एकत्र आहोत.' मी पणा विरोधात ही लढाई सुरु आहे. राजकारण म्हणजे रात्रीस खेळ चाले असं झालं आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.