माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन; विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी

Dattatraya Meghe Passes Away : विदर्भाच्या विकासासाठी लढणारे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं नागपुरात निधन झालंय. कट्टर विदर्भवादी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्यामुळे भाजप पक्षासह राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 22, 2026, 11:15 PM IST
माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन; विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी

Dattatraya Meghe Passes Away : भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री दत्तात्रय मेघे यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीय. सलग चार वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले दत्ता मेघे राज्याचे कॅबिनेट मंत्रीही होतं. दत्ता मेघे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते पण त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली. एवढंच नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही काम केलं आहे. त्यांनी लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक आणि वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केलंय. तसंच ते महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेचेही सदस्य होतं. 

Add Zee News as a Preferred Source

दत्तात्रय मेघे यांच्या राजकीय प्रवास!

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी दत्ता मेघे नेहमीच आक्रमक पाहिला मिळाले आहेत. त्यामुळे ते विदर्भाचा आवाज अशी त्याची निर्माण झाली. विदर्भाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांचा कायम लढा असायचा. त्यांची कायम इच्छा होती की विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी कायम आवाज उठवला आहे. 

दत्ता मेघे हे तब्बल चार वेळा लोकसभा खासदार होते. 1991 मध्ये ते पहिल्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून जिंकले. त्यानंतर रामटेक आणि वर्धा या मतदारसंघांतूनही त्यांनी संसदेत वेगळा विदर्भासाठी त्यांनी आवाज उठवला. दत्ता मेघे यांनी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व भूषवलंय. कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा आणि सहकार ही दोन महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.

विदर्भातील सिंचन अनुशेष असो किंवा शेतकरी आत्महत्या प्रकरण असो औद्योगिक मागासलेपण या विषयावर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे कायम लक्ष वेधून घेतलंय.

'माझे मोठे बंधू गेले'-गडकरी हळहळले 

नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दातृत्व अंगी असलेला असा मोठ्या आणि निर्मळ मनाचा नेता पुन्हा होणे नाही. विदर्भातील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील दत्ताभाऊंचे योगदान उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. गडचिरोलीपासून मेळघाटपर्यंत आदिवासी भागात दत्ताभाऊंनी मोफत वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे त्यांनी गरिबांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. विदर्भातील तरुणांना उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली. माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आणि पुढेही वैचारिक विरोधक असूनही दत्ताभाऊंनी कायम मला प्रेम-जिव्हाळा दिला व मार्गदर्शन केले. लहान बंधू प्रमाणे त्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले. प्रकृती अस्वास्थ्य असूनही विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे सर्वसमावेशी नेतृत्व राजकीय कार्यकर्त्यांसाठी आदर्श होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या परिवारास व सर्वांनाच या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. 

गरिबांना मदत करणारे 'दाताभाऊ' गेले

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दु:ख व्यक्त करत म्हटलं की, आयुष्यभर जोपासलेल्या सेवाभावी आणि दातृत्वाच्या वृत्तीने सामान्य माणसाच्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा निर्माण करणारे ज्येष्ठ भाजपा नेते आणि माझे मार्गदर्शक आदरणीय श्री. दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

दत्ताभाऊ प्रदीर्घ काळ राजकारणात होते. त्यांनी खासदार, आमदार, मंत्री अशी अनेक सन्माननीय पदे भूषविली. राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून गरीब, सामान्य माणसाचे कल्याण केले पाहिजे, हे संस्कार त्यांनी आम्हा सर्वांना दिले. शाळा तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. त्यांनी असंख्य गरीब मुलांना निःशुल्क शिक्षण दिले.  गरीब मुला- मुलींचे लग्न लावून दिले. गरिबांचे संसार उभारले. 

दत्ताभाऊंनी त्यांच्याकडे आलेल्या गरजू माणसाला कधीच रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. त्यांच्या दारात आलेला प्रत्येक दुःखी माणूस आनंद घेऊनच परत गेला. शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी आयुष्यभर गरिबांना सढळ हाताने मदत केली. त्यामुळेच त्यांना सर्वजण श्रद्धेने 'दाताभाऊ' म्हणायचे. 

दातृत्व आणि करूणेचे मूर्तिमंत रूप असलेल्या दत्ताभाऊंच्या निधनाने मी माझा कुटुंबप्रमुख गमावला आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दत्ताभाऊंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या व कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

 ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत दत्ताजी मेघे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, "दत्ताजी मेघे यांनी विदर्भाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे खुली झाली. एक अनुभवी संसदपटू आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दिग्गज नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दत्ताजी मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दातृत्वाचा धनी हरपला!

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी असायचा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कायमच सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच आयुष्यभर ते कार्यरत राहिले. त्यामुळेच एक लोकनेता अशी त्यांची प्रतिमा होती. विविध शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी विदर्भातील तरुणांच्या शिक्षणाची सोय तर केलीच आणि या संस्थाही नावारूपाला आणल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे एक मोठा आधार ज्येष्ठांना मिळाला. दातृत्व हे दत्ताभाऊंचे वैशिष्ट्य होते. अनेक गरिबांवर त्यांनी मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या. एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. वर्धा, नागपूर-विदर्भातील विकासाच्या राजकारणात त्यांनी कधीही पक्षीय भेद आणला नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सुद्धा त्यांचा सदैव पुढाकार असायचा. नव्या पिढीचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षात त्यांचे चाहते आहेत, हेच त्यांच्या यशाचे गमक. माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. अनेक प्रश्नांवर वडिलकीच्या नात्याने ते मार्गदर्शन करायचे. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. दत्ताभाऊंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More