Maharashtra Akola Hottest City in World : जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या अव्वल 10 ठिकाणांपैकी तीन ठिकाणं महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावरही महाराष्ट्रातील ठिकाण आहे. हे ठिकाणं कोणतं ते पाहूयात...

Hottest Place In World: मे महिना सुरु होण्याआधीच विदर्भातील अनेक भाग तीव्र उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडले आहेत. मंगळवारी तापमानाने 44 डिग्री सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्यामुळे मंगळवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विक्रमी तापमान होतं. देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्ये मंगळवारी विदर्भातील अनेक ठिकाणाचा समावेश होता.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, विदर्भातील कमाल तापमान सातत्याने सरासरीपेक्षा 1.3 डिग्री सेल्सिअस ते 3.8 डिग्री सेल्सिअसने अधिक राहिले. उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत असल्याचे हे संकेत असल्याचं मानलं जात आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याची नोंद झाली. मंगळवारी विदर्भात कुठेही पावसाची नोंद झाली नाही.
अकोल्यामध्ये पार 44 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. 44 डिग्री सेल्सिअस तापमानासहीत अकोला हे मंगळवारी जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाण ठरले. एल्डराडो वेदर डॉट कॉमनुसार, अमरावतीमध्ये 43.8 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. वर्ध्यामध्ये मंगळवारी तापमान 43.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. हे दोन्ही जिल्हे सर्वात तापमान असलेल्या शहरांच्या यादीत तिसऱ्या आणि सातव्या स्थानी राहिली. ही सर्व शहरं मंगळवारी जागतिक नकाशावर अधिक तापामानामुळे 'हॉटस्पॉट' ठरली.
मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी अकोल्याने राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक तापमान असलेल्या ठिकाणांच्या यादीत पहिलं स्थान नोंदवलं. यावरून विदर्भ आणि आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणि दाहकता अधोरेखित होते. विशेष म्हणजे, भारतातील 20 सर्वाधिक उष्ण ठिकाणांच्या यादीत विदर्भातील नऊ जिल्ह्यांचा समावेश होता.
नागपूरमध्ये तापमान 42.2 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले. देशातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत नागपूर 11 व्या स्थानी होतं. चंद्रपूर आणि वाशिममध्येही जवळपास इतक्याच तापमानाची नोंद झाली. गडचिरोली आणि यवतमाळ येथेही प्रत्येकी 42.6 डिग्री सेल्सिअसइतक्या उच्च तापमानाची नोंद झाली.
रात्रीच्या वेळीही तापमान अधिक असल्याने परिस्थिती अधिकच बिकट आहे. चंद्रपूरमध्ये रात्रीचे किमान तापमान 27.6 डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले. म्हणजेच सूर्यास्तानंतरही नागरिकांना फारसा दिलासा मिळत नाहीये. दिवसभर कडक ऊन आणि त्यानंतर रात्रीही उकाडा कायम राहत असल्याने, नागरिकांच्या अस्वस्थतेत वाढ झाली आहे. त्यामुळे, दुपारच्या सर्वाधिक उष्ण वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना देणाऱ्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 16 ते 19 एप्रिल या कालावधीत विदर्भाच्या काही तुरळक भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मध्य भारतातील तापमानात आणखी 2 ते 4 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची अपेक्षा आहे. नजीकच्या काळात उष्णतेपासून कोणताही तात्काळ दिलासा मिळण्याची चिन्हे नसल्याने, विदर्भ आता तीव्र आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.