महाराष्ट्र दिवाळखोरीच्या मार्गावर? 'लाडकी बहीण' बंद होणार? फडणवीस म्हणाले, 'निवडणूक झाली की...'

CM Devendra Fadnavis On Financial Condition Of State: मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांकडून वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या काही मुद्यांवर अगदी स्पष्टपणे भाष्य केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 14, 2025, 01:38 PM IST
महाराष्ट्र दिवाळखोरीच्या मार्गावर? 'लाडकी बहीण' बंद होणार? फडणवीस म्हणाले, 'निवडणूक झाली की...'
फडणवीसांनी भाषणातून सांगितली आकडेवारी (प्रातिनिधिक फोटो)

CM Devendra Fadnavis On Financial Condition Of State: विविध लोकप्रिय योजनांना निधी दिला जात असल्याने महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त भार आला असून राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याच्या विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उत्तर दिलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीसांनी राज्यामधील गुंतवणूक, राज्याची आर्थिक स्थिती आणि लाडकी बहिणीसारख्या योजना बंद होणार का यासंदर्भात सविस्तर भाष्य केलं. 

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्रातील गुंतवणुकीबद्दल फडणवीस काय म्हणाले?

"देशातील इतर राज्याच्या तुलनेत राज्याने भांडवली गुंतवणूक जास्त केलेली आहे. कुठलीही तडजोड आपण केलेली नाही. महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पुढे चालला आहे. दावोसमध्ये आपण पाहिले की 15 लाख कोटी रुपयांचे करार केले होते. त्यातील 5 लाख कोटी गुंतवणूक ही विदर्भातील होती. कोकणात 2 लाख कोटी गुंतवणूक होती. 2022 ते 25 चा विचार केला तर दावोस गुंतवणूक ही 17 लाख कोटींवर जाते. सामंजस्य करारापैकी अंमलबजावणी झाली त्याचे प्रमाण 75 टक्के आहे. पहिल्या 2 वर्षांतील 90 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच करार अंमलबजावणी सुरु आहे. 13 लाख 75 हजार कोटींची गुंतवणूक आहे. 7 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. एफडीएमध्ये (थेट परदेशी गुंतवणुकीत) महाराष्ट्र नंबर वन आहे," असं फडणवीस म्हणाले. 

गडचिरोली हे नवे इनव्हेसमेंट मॅग्नेट 

"परदेशी गुंतवणूक पाहिली तर आपल्यानंतर जी तीन राज्ये एकत्रित केली तरी आपली गुंतवणूक जास्त आहे. 2025-26 मध्येही 91 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. देशातील एकूण गुंतवणूक पैकी 31 गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात आली आहे. विदर्भात गडचिरोली हे नवे मॅग्नेट तयार झाले आहे. सर्वाधिक गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये आली आहे. गुंतवणूक केलेल्या कंपन्यांमधील काहींचे उत्पादन सुरु झाले आहे. त्यामुळे सोलर मॉड्युलमध्ये विदर्भ हे देशात एक नंबर होईल," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

नक्की वाचा >> ...तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार! फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनातील भाषणात स्पष्ट सांगितलं

ईव्ही कॅपिटल म्हणून पुढे येतोय मराठवाडा

"स्टीलमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक आहे. या माध्यमातून एक लाख रोजगार निर्माण होईल. गोल गॅसिफिकेशनमध्ये देशातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे 70 हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात आली आहे. ईव्ही कॅपिटल म्हणून मराठवाडा तयार होतोय. 50 हजार कोटींची व 30 हजार रोजगार एवढी मोठी गुंतवणूक येथे आली आहे. टोयोटा, स्कोडा अशा जगातील सर्वात मोठे ब्रँड मराठवाड्यात आले आहेत.  इतर क्षेत्रात ही चांगली गुंतवणूक येत आहे. नाशिक, कोकण असेल त्याचबरोबर पाण्यासोबत सातारा व कोल्हापूर येथे ही गुंतवणूक येत आहे.  मिहान हे देशातील आयटीमधील 'बिग सिक्स' आहेत ते सर्व मिहानमध्ये आहेत. प्रत्यक्ष 1 लाख 25 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे," असं फडणवीसांनी सांगितलं. 

ठाकरेंच्या आमदाराला झापलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांना भाषणादरम्यान झापले. खरात यांनी मराठावाडा आणि विदर्भाला काय दिलं अशा अर्थाचा सवाल केल्यानंतर फडणवीस संतापले. "मुख्यमंत्री सभागृह नेते बोलतात त्यावेळेस मध्येच बोलायचे नसते. आणि मराठवाडा विदर्भ या आधी कोणी काय दिले सांगितले तर खूप काही समोर येईल," असं खोचक उत्तर फडणवीसांनी दिलं. 

नक्की वाचा >> आज मेस्सीच्या हस्ते लॉन्चिंग टार्गेट 2034 चं... 'प्रोजेक्ट महादेव' आहे तरी काय? A To Z माहिती

लाडकी बहीण योजना बंद होणार?

निधी आभावी लाडकी बहीण योजना बंद होईल असा दावा विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला. यावरुनच फडणवीसांनी आपल्या भाषणामधून सूचक विधान करत उत्तर दिलं. "अनेकांनी सरकारच्या योजनांवर शंका घेतली. निवडणूक झाली की योजना बंद करतील बोलले. कुठलीही योजना बंद होणार नाही. पाच वर्षे योजना सुरु राहतील," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. "महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. 2030, 2035 आणि 2047 असे तीन टप्पे केले आहेत. 2029-30 दरम्यान देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्र असेल," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

राज्याची दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल?

"देशात तीन राज्य आहेत ज्यांचे दायित्व 20 टक्क्यांपेक्षा कमी. त्यात गुजरात, ओडिशा व महाराष्ट्र आहे. राजकोषीय तूट ही तीन टक्क्यांच्या आत ठेवणे गरजेचे आहे. लाडकी बहीण व शेतकरी यांना पैसे देऊन ही तूट 3 टक्क्यांपर्यंत ठेवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. ही तूट सध्या 2.96 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे आपण दिवाळखोरीकडे चाललेलो नाही," असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More