...तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार! फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनातील भाषणात स्पष्ट सांगितलं

Maharashtra Winter Session Devendra Fadnavis Concluding Speech: विधानसभेमध्ये फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. त्यामध्ये मुंबईसंदर्भातील दाव्याचाही समावेश होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 14, 2025, 01:00 PM IST
...तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार! फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनातील भाषणात स्पष्ट सांगितलं
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं भाषण

Maharashtra Winter Session Devendra Fadnavis Concluding Speech: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. या वर्षभरामध्ये सरकारसमोर अनेक आव्हानं आली. मात्र ती आव्हान आम्ही पूर्ण केली असं फडणवीस म्हणाले. तसेच सरकारमधील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते एकत्रितपणे निर्णय घेतात हे ही सांगायला फडणवीस विसरले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Add Zee News as a Preferred Source

या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या...

"अनेक वर्ष निवडणुका न झाल्याने कार्यकर्त्यांच्या मनात दुःख होते, पण आता निवडणुका सुरु झाल्यात. आम्ही कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सातत्याने करतो. नगरपालिका निवडणुका झाल्या आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. अनेक वर्षे निवडणूक न झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दु:ख होते. आता लोकशाही खालच्या स्तरापर्यंत पोहोचण्यास महाराष्ट्र गतीने काम करेल. मध्यंतरी महाराष्ट्राला भोगावे लागले. या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या कारण महाराष्ट्र आता थांबणार नाही. सकारात्मकतेने पुढे जायचा आमचा विचार आहे. विकासाचा अजेंडाच आम्ही निवडणुकीत मांडणार," असं फडणवीस म्हणाले. यावरुन विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केल्यानंतर फडणवीसांनी, "कुठेही टीका केली नाही. सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण नको," असा सल्ला दिला.

दोन्ही बाजूच्या नेत्यांना आवाहन

"अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडविण्यासाठी वाटचाल करायची आहे. सभागृहातील दोन्ही बाजूच्या नेत्यांना आवाहन आहे. रचनात्मक कार्यातून महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. आपण सारे लोक हिताचा विचार करणारे आहोत. महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार करूया," असं आवाहन फडणवीसांनी केलं. 

...तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील!

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव असल्याची टीका वारंवार समोर येत असतानाच यावरही फडणवीसांनी आपल्या भाषणादरम्यान भाष्य केलं. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर विकास कामांना गती आल्याचं पाहायला मिळेल असंही फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं. 

"106 हुतात्म्यांनी तयार केलेला महाराष्ट्र आहे. मुंबई तोडली जाईल असा विचार करू नये. निवडणूक आली की अशा टीका होतात. सभागृहात सांगतोय, मुंबई कालही महाराष्ट्राची होती आणि जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत राहील," असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला त्या तत्वाने महाराष्ट्र चालत राहील. महाराष्ट्राला हे तत्त्व मान्य होते. पण देशपातळीवर अनेक संभ्रम होते म्हणून सीबीएससी पुस्तकात यापूर्वी मराठा साम्राज्य व छत्रपती एक पॅरापुरता होता तर मुघलांचा 17 पानांचा. आता शिवरायांचा 21 पानांचा अभ्यास सीबीएससीने पुस्तकात घेतला आहे. शौर्याचा इतिहास केंद्राने घेतला त्याबाबत आभार मानतो," असं फडणवीस म्हणाले.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More