'....आता देवालाच माहित,' गिरीश महाजनांचं मोठं विधान, 'शिवसेना-NCP मध्ये टोकाचे वाद, आम्हाला म्हणतात तुम्ही...'

Girish Mahajan on Nashik Guardian Minister: शिवसेना-राष्ट्रवादीतील टोकाच्या मतभेदामुळे रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे.  तर नाशिक पालकमंत्रिपदाबाबत देवाला माहित असं सूचक विधान 'झी 24 तास नाशिक सन्मान' कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 20, 2026, 06:57 PM IST
'....आता देवालाच माहित,' गिरीश महाजनांचं मोठं विधान, 'शिवसेना-NCP मध्ये टोकाचे वाद, आम्हाला म्हणतात तुम्ही...'

Girish Mahajan on Nashik Guardian Minister: नाशिक पालकमंत्रिपदाबाबत देवाला माहीत असं सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. 'झी 24 तास नाशिक सन्मान' कार्यक्रमात त्यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलं. रायगड पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे प्रश्न सुटलेला नाही, असं महाजन यांनी सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नाशिकला पालकमंत्री कधी मिळणार? या प्रश्नावर त्यांनी आता देवाला माहित, आपण काय सांगणार. देवाच्या भरवशावर सोडून देऊ असं उत्तर त्यांनी दिलं. "खरं म्हणजे नाशिकसाठी कुठे वाद नाही. पण रायगडसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघात खूप टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. ते आम्हाला म्हणतात नाशिक तुम्ही घेऊन टाका आणि रायगड आम्हाला द्या."

"रायगडला एकच पालकमंत्री होणार आहे आणि दोघांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. पण प्रश्न सुटला नसला तर काही थांबलं आहे का?," अशी विचारणाही त्यांनी केली. शेजाऱ्याच्या घऱात भांडण आणि तुम्हाला त्रास अशी स्थिती आहे का? विचारलं असता त्यांनी मान्य करत तसंच झालं असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, "भांडण्याचा आवाज आमच्याकडे जास्त येत आहे. आमची झोप उडवली आहे".

मुंबई-नाशिक एसी लोकलसेवा सुरु करणार

दरम्यान यावेळी गिरीश महाजन यांनी मुंबई-नाशिक एसी लोकलसेवा सुरु करणार आणि मुंबई-नाशिक प्रवास दोन तासांवर आणणार अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. नाशिक विमानतळालाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, विकास उपक्रम, उद्योग, आर्थिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी हे आश्वासन दिलं आहे. 

ते म्हणाले की, "मुंबई-नाशिक जोडण्यासाठी आम्ही एक प्रयत्न करत असून लवकरच त्याची सुरुवात होईल. इतगपुरीपर्यंत, कसाऱ्यापर्यंत येणारी लोकल नाशिकपर्यंत आणत आहोत. म्हणजे दोन तासात मुंबई-नाशिक गाठता येईल. याचा खूप मोठा प्रभाव नाशिक शहरावर होणार आहे. नाशिकच्या विकासाला याचा हातभार लागेल. काही तांत्रिक कारणाने साधी लोकल चालवली जाऊ शकत नाही. पण एसी लोकल चालवण्यात कोणतीही अडचण नाही. तशी मागणीही मी केली आहे. रेल्वेमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांनीही मागणी केली आहे. लवकरच ही लोकल सुरु होईल". 

"विमान जोडणी फार महत्त्वाची आहे. आता आपण जवळपास 1000 कोटींच्या कामाचा शुभारंभ केला आहे. धावपट्टीची लांबी वाढवली आहे. कार्गो येऊ शकेल, मालवाहतूक होऊ शकेल. नवीन धावपट्टयाही करत आहोत. पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. आंतरराष्ट्रीय वाहतूक कसं सुरु होईल यासाठी वर्षभरासाठी प्रयत्न आहेत," असं त्यांनी सांगितलं.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More